पणजी : – महाराष्ट्राच्या पुरुष कबड्डी संघाने उपांत्य सामन्यात हरयाणाकडून 29-39 असा पराभव पत्करल्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. याच बरोबर ट्रायथलॉनमध्ये महाराष्ट्राने सुवर्णपदकाला वसणी घातली. यासह महाराष्ट्राने यंदाच्या स्पर्धेत पदकांचे द्विशतक पार केले. महाराष्ट्राच्या नावार हा विक्रमच प्रस्थापीत झाला आहे.
या सामन्यात आक्रमक सुरुवात करीत हरयाणाने 12 व्या मिनिटाला महाराष्ट्रावर पहिला लोण देत 18-11 अशी आघाडी घेतली. मध्यंतराला 20-16 अशी नाममात्र आघाडी हरयाणाकडे होती. उत्तरार्धात आणखी एक लोण देत ती 33-22 अशी वाढवली.
महाराष्ट्राकडून अस्लम शेख, आदित्य शिंदे, आकाश शिंदे, किरण मगर, शंकर गदई यांनी संघाचा पराभव टाळण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. त्यात ते अपयशी ठरले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेनादलाने चंदीगड 49-25 असे नमवत अंतिम फेरीत धडक दिली.