पणजी (वास्को) :- गतवर्षी अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या रोड सायकलिंगमधील सुवर्णपदक विजेत्या सूर्या थाटूकडून महाराष्ट्राला 120 किलोमीटर रोड रेसमध्ये सुवर्णपदकाची अपेक्षा होती. पण अपघातामुळे हे पदक निसटले. पिंपरी-चिंचवडचा सूर्या शर्यतीचे अखेरचे 7 किलोमीटरचे अंतर बाकी असताना अग्रेसर असलेल्या चार स्पर्धकांमध्ये होता. पण त्याच्या सायकलचा अपघात झाल्यानंतर त्यातून सायकल नीट करणे आणि सावरणे कठीण गेले. त्यामुळे हे पदक गमवावे लागले. “हा अपघात झाला नसता, तर रोड रेसमध्ये सूर्याने नक्की महाराष्ट्राला पदक जिंकून दिले असते,” अशी प्रतिक्रिया राज्याचे प्रशिक्षक मिलिंद झोडगे यांनी व्यक्त केली.