नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांचे हित हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बंधू-भगिनींच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. यासाठी गरज पडल्यास वैयक्तिक मोठी किंमत चुकवण्यास तयार आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतावर लागू करण्यात आलेल्या टॅरिफच्या निर्णयावरून अमेरिकेला उत्तर दिले. एमएस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. याप्रसंगी स्वामीनाथन यांच्या सन्मानार्थ एक नाणे आणि टपाल तिकिट देखील जारी करण्यात आले. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदींचे हे विधान आल्यामुळे चर्चा होत आहे. नरेंद्र मोदी म्हणाले, भारत आपल्या शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या कल्याणासाठी प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता ग्रामीण भारताच्या, खेड्यांमधील समुदायांच्या संरक्षणाच्या जबाबदारीबाबतचा सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, पंतप्रधानांनी आपल्या भाषणादरम्यान शेती आणि संबंधित क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने राबविलेल्या विविध योजनांवर प्रकाश टाकला. तसेच हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांमध्ये अन्न उत्पादन टिकवून ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.