Nana Patole : पंतप्रधानांमुळे जागतिक पातळीवर देशाची मान शर्मेने खाली गेल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. जागतिक पातळीवर पंतप्रधान रिजेक्ट माल असल्याचे पटोले म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवरून आणि त्या दरम्यान घडणाऱ्या घडामोडींवरून पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली. पंतप्रधानांच्या अशा वागण्यामुळे जागतिक पातळीवर भारताची मान शर्मेने खाली जात असल्याचे ते म्हणाले. पटोले (Nana Patole) म्हणाले, देवेंद्र फडणवीस नेहमी सांगतात की, पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांमुळे देशाचा फायदा होतो, अनेक महत्त्वपूर्ण करार केले जातात. मात्र, आता फडणवीसांनीच यावर उत्तर दिले पाहिजे की, इटलीमध्ये जाऊन तिथल्या महिला राष्ट्राध्यक्षांना चॉकलेटची भेट देणे कितपत योग्य आहे? पंतप्रधानांचे हे वर्तन हास्यास्पद असल्याचे सांगत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. Nana Patole काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्यावर रिजेक्ट माल म्हणून टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. जे राहुल गांधींना रिजेक्ट माल म्हणत होते, त्यांनी आता पाहावे की, त्यांचे स्वतःचे पंतप्रधान आज जागतिक पातळीवर रिजेक्ट माल ठरत आहेत, असे पटोले (Nana Patole) म्हणाले. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांमुळे देशावर मोठा आर्थिक भार पडत असून, या दौऱ्यांमधून देशाच्या पदरात काय पडले?, असा सवालही उपस्थित केला. नुकतेच सर्वोच्च न्यायालयातील एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी तरुण पिढीचा उल्लेख कॉकरोच असा केला. या वक्तव्यावरून आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या ट्रेन्डवरून पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशातील तरुण पिढीचा सातत्याने होणारा अपमान आणि वाढती बेरोजगारी यांमुळेच तरुणांमध्ये केंद्र सरकारविरोधात तीव्र असंतोष असल्याचे ते म्हणाले. देशाच्या तरुण पिढीला अशा पद्धतीची उपमा दिली जाणे आणि त्यांची सामाजिक व्यवस्थेमध्ये अशी संभावना होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे पटोले म्हणाले.