नागपूर – राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णवाढीत नागपूर राज्यात आघाडीवर आहे. ऐन उन्हाळ्यात रुग्ण वाढत असल्याने नागपूरमद्ये चिंता वाढली असून करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊनच शस्त्र उगारण्यात आलं आहे. मात्र याला स्थानिक प्रतिनिधींकडून विरोध होत असल्याचं चित्र आहे. यावरून आता महाविकास आघाडी सरकारमध्येच कुरबुर सुरू झाली आहे.
शहरात लॉकडाऊन करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी केला आहे. या लॉकडाऊनला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. तसेच लॉकडाऊन संदर्भात लोकप्रतिनिधींशी चर्चा केली असती तर अनेक पर्याय समोर आले असते. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व प्रतिनिधींना सोबत घेऊन योग्य निर्णय घेतला. मात्र नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत हे एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप अहिरकर यांनी केला आहे.
नागपूर येथे रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या म्हणजे शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन जाहीर कऱण्यात आला आहे. तर १५ ते २१ मार्च कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र राष्ट्रवादीसह भाजपचा देखील नागपूरमधील लॉकडाऊनला विरोध आहे. त्यामुळे लॉकडाऊनवरून राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.