नेवासा : सध्या महाराष्ट्रात सर्वत्र अतिवृष्टीमुळे विशेषता: शेतकरी, दुकानदार आणि गोरगरीब कुटूंबियांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामध्ये अन्नधान्याचेही अतोनात नुकसान होवून अनेक शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. शेकडो हेक्टर पिके वाहून गेली, अनेक मुकी जनावरे मृत्युमुखी पडली आणि अनेकांच्या घरात पाणी शिरून घर संसार, किराणा, किंमती वस्तूही पाऊसाच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. अचानक कोसळलेल्या या संकटामुळे त्यांना मदतीची नितांत गरज आहे. म्हणून नागेबाबा परिवार नेहमीच अशा अडचणीच्या वेळी मदतीसाठी पुढे येत असतो. याच भावनेतून सामाजिक बांधिलकी म्हणून नागेबाबा मल्टीस्टेट, नागेबाबा पतसंस्था, या दोन्ही संस्थेतील कर्मचारी वृंद व नागेबाबा परिवारातील इतर सहकारी या सर्वांच्या सहकार्यातून तसेच मुख्यमंत्री महोदय यांच्या विनंतीला मान देऊन नागेबाबा परिवाराच्यावतीने चार लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला. अस्मानी संकटात सामान्य जनतेला मदत व्हावी म्हणून संबंधित धनादेश अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. याप्रसंगी सहाय्यक निबंधक श्रीमती वाघमारे तसेच गौतम देवळालीकर आणि व्यवहारे तसेच जिल्हा विशेष लेखापरीक्षक आणि नागेबाबा परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते.