राहुरी : उल्हासनगर येथील एका इसमाने राहुरी येथील नितीश पवार यांचे आधार कार्ड व पॅनकार्डचा गैरवापर करून वेगवेगळ्या बॅंका व फायनान्स कंपन्यांकडून सुमारे ५ लाख रुपये कर्ज काढून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नितीश दादासाहेब पवार हे राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द येथे राहतात. राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नितीश पवार यांना मोटारसायकल घ्यायची असल्याने त्यांनी दि. ९ सप्टेंबर २०२४ रोजी श्रीरामपूर येथील आयडीएफसी बँक येथे कर्ज घेण्यासाठी अर्ज केला. त्यावेळी तेथील बॅक अधिकारी यांनी नितीश पवार यांचे सीबील चेक केले असता नितीश पवार यांचे आधार कार्ड व पॅन कार्डचा गैरवापर करून उल्हासनगर येथील मनिष पालव याने नितीश पवार यांच्या बरोबर जाॅईंट खाते उघडले.
त्यांच्या नावावर विविध बॅकां, फायनान्स कंपनीचे एकूण ४ लाख ४५ हजार ७६ रुपये कर्ज घेतले. त्या कर्जाचे हफ्ते भरलेले असून त्यापैकी २ लाख २९ हजार ८७० रुपये कर्ज भरणे बाकी आहे, असे समजले. त्यामुळे तुमचे कर्ज प्रकरण होणार नाही, असे बॅंक अधिकाऱ्याने नितीश पवार यांना सांगितले.आपण कोणत्याही बॅंकेचे कर्ज घेतले नसून उल्हासनगर येथील एका भामट्याने आपले आधार कार्ड व पॅन कार्डचा गैरवापर करून कर्ज काढले आहे, असे समजल्यावर नितीश दादासाहेब पवार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मनिष अनिल पालव (उल्हासनगर), याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.