नवी दिल्ली : सोशल मीडियातून बाहेर पडण्याबाबत दिलेल्या सूचक माहितीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दिल्लीतील हिंसाचारावरुन भावूक झाल्याचे दिसले. भाजपाच्या बैठकीत दिल्ली हिंसाचाराचा अप्रत्यक्षरीत्या उल्लेख करत देशात शांतता आणि एकता गरजेची आहे, असे सांगताना मोदी भावूक झाले. तसेच राष्ट्रहितापेक्षा पक्ष कधीच मोठा असू शकत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पार्लमेंट लायब्ररीच्या इमारतीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत मोदी बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह, केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी हे सुद्धा या बैठकीसाठी संसद भवनातील सभागृहात उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपला सबका साथ सबका विकास या धोरणाचा पुनरुच्चार करताना सबका विश्वासही गरजेचा असल्याचे म्हटले. यावेळी पहिल्यांदा देश नंतर पक्ष अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधानांनी 26 फेब्रुवारी रोजी ट्विटद्वारे पहिल्यांदा भाष्य केले होते. हिंसाचारानंतर 69 तासांनंतर त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारे भाष्य केल्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमारही झाला होता.
दरम्यान, मोदींनी सोमवारी रात्री ट्विट करीत आपण सर्व प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन बाहेर पडणार असल्याचे सूचक विधान केले. तसेच याबाबत आपण रविवारी बोलणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मोदींच्या या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, मोदींकडून नव्या भारतीय सोशल मीडियाची घोषणा करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. संसदीय पक्षाच्या बैठकीत नरेंद्र मोदी म्हणाले, राष्ट्रहित हे पक्षापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. आपण सगळ्यांनी राष्ट्रहितासाठी काम केले पाहिजे. काहीजण राष्ट्रहितापेक्षा आपल्या पक्षासाठी काम करतात. विकास हाच आपला मूलमंत्र असला पाहिजे. विकासासाठी शांतता आणि सामाजिक सलोख्याची नितांत आवश्यकता आहे.
गेल्या आठवड्यात दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारामध्ये 46 जणांचा मृत्यू झाला तर 200 हून अधिक नागरिक जखमी झाले. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेतल्यामुळेच दिल्लीत हिंसाचार उसळला, असा आरोप कॉंग्रेसने केला. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रहिताची भूमिका मांडली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला सोमवारी सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासून विरोधकांनी अधिवेशनामध्ये दिल्ली हिंसाचाराचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्यास सुरुवात केली आहे.