नगर -जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आहेत. करोना संकटकाळात त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळेच नगरमध्ये करोना रोखण्यात यश मिळाले. त्यामुळे नगरकर जिल्हाधिकाऱ्याच्याच पाठिशी असल्याची भूमिका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड भैरवनाथ वाकळे यांनी व्यक्त केली.
या संदर्भात भूमिका स्पष्ट करताना वाकळे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांना टार्गेट करून इतके दिवस बेपत्ता असलेले राजकारणी एकत्र येत आहेत. नगरची जनता हे कदापि खपवून घेणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांना नाव ठेवणारे पुढारी करोना संकटकाळात जनतेसोबत न रहाता कुठे गायब होते?, असा सवालही वाकळे यांनी उपस्थित केला आहे.
नगरची महापालिका राष्ट्रवादी आणि आरएसएस-भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास महापालिकेची यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. करोना वैद्यकिय सेवा मनपाने न चालवता खासगी चालविली जात असल्याच्या बातम्या येत आहेत, हे दुर्देवी आहे.
आरोग्यसेवा, पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती या कामांचा नगरमध्ये बोजवारा उडालेला आहे. करोना संकट काळातही नागरिकांचे आरोग्यासह इतर प्रश्न सोडविण्याऐवजी कचरा घोटाळा, वाहन घोटाळा, ओढे-नाले बुजविण्याचा घोटाळा, यासारखे पैसे खाऊ कार्यक्रम महापालिकेत सुरू होते, अशी टीका वाकळे यांनी केली आहे.
मनपातील अधिकाऱ्यांवर नैतिक नियंत्रण नसल्याने काही अधिकारी गुन्हे दाखल होऊन काही दिवस फरार होते. खुद्द मनपातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने करोना संसर्गग्रस्त झालेले आहेत.
या अपयशाचे खापर जिल्हाधिकारी यांच्यावर फोडणे निषेधार्ह असल्याचे वाकळे म्हणाले. बळजबरी लॉकडाऊन करण्यापूर्वी पुढाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे शेतकरी, कामगार, छोटे हातगाडीवाले, भाजीविक्रेते, फळविक्रेते, छोटे व्यापारी, खासगी नोकरदार व सामान्य माणसांची रोजगाराची, वेतनाची व उदरनिर्वाहाची सोय लावावी, अशी मागणीही वाकळे यांनी केली.