Municipal Election 2026 : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. जागावाटपाचा तिढा आणि स्थानिक नेत्यांमधील मतभेद टोकाला गेल्यामुळे अखेर राज्यातील १४ महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती तुटली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्याने महायुतीमधील फाटाफूट आता अधिकृतपणे समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या महापालिकांमध्ये आता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. या शहरांमध्ये जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. काही ठिकाणी भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळत असल्याने पक्षाने आक्रमक भूमिका घेतली, तर काही ठिकाणी शिंदे गटाने भाजपसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. स्थानिक राजकीय गणिते बिघडू नयेत, यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी या १४ ठिकाणी ‘स्वबळाचा’ निर्णय घेतला असून यामुळे आता या शहरांत बहुरंगी लढती रंगणार आहेत. राज्यात १४ ठिकाणी युती तुटली असली तरी, मुंबई आणि ठाणे या प्रतिष्ठेच्या महापालिकांमध्ये मात्र भाजप आणि शिंदे गटाने आपली युती कायम राखली आहे. मात्र, या ठिकाणी महायुतीचा तिसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला युतीपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे वेगळी असणार आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांमध्ये प्रचंड गोंधळ आणि नाराजी पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पक्षांतर केलेल्या ‘आयाराम’ नेत्यांना तिकीट दिल्याने अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. काही इच्छुकांनी तर पक्षाच्या निर्णयाविरोधात बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरले आहेत. त्यामुळे अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. राज्यातील या सर्व महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार असून, १६ जानेवारी रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाईल. मुंबई, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात ठाकरे गट, भाजप आणि शिंदे गट यांच्यात अस्तित्वाची लढाई होणार आहे. युती तुटलेल्या १४ शहरांमध्ये मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने जाणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.