सातारा – करोना रोखण्यासाठी सातारा पालिका प्रशासनाने शहरात धडक कारवाया सुरू केल्या आहेत. मास्कचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे व निर्धारित वेळेत दुकान बंद न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पालिकेच्या पथकाने सोमवारी शहरात ठिकठिकाणी 25 जणांवर कारवाई करून 17 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला.
सातारा शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत असताना नागरिक शासनाच्या आदेशांची वारंवार पायमल्ली करत आहेत. मास्कचा वापर न करणे, दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करणे, हे प्रकार सतत वाढत असल्याने पालिका प्रशासनाने दंड वसुली सुरू केली आहे.
पालिकेच्या पथकाने सोमवारी दुपारी राजवाडा, 501 पाटी, देवी चौक ते मोती चौक या मार्गावर कारवाई केली. मास्कचा वापर न करणाऱ्या 15 नागरिकांकडून प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे साडेसात हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या व दुपारी दोननंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्या दहा दुकानदारांकडून प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे एकूण दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापुढे मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.
चार पथकांची नेमणूक
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून आठ दिवसांत 23 हजार 500 रुपयांचा दंड पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी वसूल केला आहे. दंडात्मक कारवाईसाठी पालिकेने या कामी प्रत्येकी पाच कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या चार पथकांची नेमणूक केली आहे.