औंध -औंध, बाणेर, बालेवाडी परिसराला कमी तर बालेवाडी गावठाण परिसरात गेल्या आठवड्यापासून पालिकेचा पाणीपुरवठाच झाला नसल्याचे तक्रार नागरिक करीत आहेत. अनियमित व कमी वेळ पाणीपुरवठा यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
औंध, बाणेर, बालेवाडी परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आमदार, आयुक्त तसेच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची पाणीटंचाईवर नागरिकांसमवेत बैठकही झाली. यामध्ये लोकप्रतिनिधींनी सूचनाही केल्या परंतु, त्यानंतर अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याने पाणी टंचाई बैठकीला आले आणि चहा पिऊन गेले, असाचा प्रकार झाला आहे.
औंध, बाणेर, बालेवाडी परिसराला पाणी मिळत नसल्याने रहिवासी सोसायट्यांना टॅंकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पालिकेला कळविल्यानंतर काही वेळी पालिकेतर्फे पाण्याचे टॅंकर पाठविण्यात येतात. परंतु, काही दिवसांपासून वाहतूक पोलिसातर्फे पाण्याच्या टॅंकरसाठी दुपारी एक ते चार वेळेतच फक्त वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येत आहे, त्यामुळे पालिकेतर्फे टॅंकरद्वारे पुरवण्यात येणाऱ्या पाण्याची देखील गैरसोय होत आहे. या संदर्भात पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, काही तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठ्यास अडचणी आल्या होत्या. परंतु, आता पाणीपुरवठा सुरळीत चालू करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
बालेवाडी परिसराला गेल्या सहा महिन्यांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. स्मार्ट सिटीमध्ये आमचे बालेवाडी गाव घेतले तरीही या ठिकाणी कोणत्याही प्रकारे फरक पडलेला नाही. नागरिकांची प्राथमिक गरज असलेले पाणीच व्यवस्थित होत नाही. बालेवाडी गावठाण तसेच भिमनगर परिसरातील नागरिक सहा महिन्यांपासून समस्येला तोंड देत आहेत.
– संदीप कांबळे, स्थानिक नागरिक