मुंबईत लवकरच सगळ्यांचे लसीकरण रोडमॅप तयार; आदित्य ठाकरे यांचा दावा

मुंबई – राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू आहे. गेले काही दिवस रुग्णसंख्या थोडी कमी होताना दिसत असली तरी अजूनही दैनंदिन आकडे मोठेच आहेत. या पार्श्वभूमीवर स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण वाढवण्याची आवश्यकता असून, त्यासाठी राज्य सरकारचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. याबाबत बोलताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी अनेक बाबी स्पष्ट केल्या. लवकरच मुंबईत सगळ्यांचे लसीकरण केले जाईल, असा दावा त्यांनी केला आहे.
इतर राज्यांप्रमाणे लसीसाठी आम्हालाही संघर्ष करावा लागत आहेत. या स्थितीवर मात करण्यासाठी व पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होण्यासाठी आम्ही विदेशातून लस आयात करता येईल का, याची चाचपणी सुरू केली आहे. मुंबईत तीन आठवड्यांत सर्वांचे लसीकरण करण्यासाठी आम्ही रोडमॅप तयार ठेवला आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास निश्चितच आम्ही हा रोडमॅप तडीस नेऊन दाखवू, असा विश्वासही आदित्य यांनी व्यक्त केला.
लसीकरणाबाबत आता सकारात्मक वातावरण आहे. लोकांच्या मनात आधी जो संभ्रम होता तो आता दूर झाला आहे. लसीचे दोन्ही डोस घेण्यास लोक आता तयार आहेत. ही खूप मोठी बाब असून सरकारने आता प्राधान्याने लसीकरण केले पाहिजे, असेही आदित्य म्हणाले. संपूर्ण देशात जेव्हा लसीकरण पूर्ण होईल तेव्हाच प्रत्येक भारतीय सुरक्षित होईल, असे आदित्य यांनी पुढे नमूद केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी कालच मुंबईमध्ये करोना प्रतिबंधक लशींची पुरेशी उपलब्धता होण्याच्या दृष्टीने या लशींची जागतिक पातळीवरून खरेदी करण्याच्या अनुषंगाने शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतर त्यांनी या सूचना केल्या आहेत.





