9 फेब्रुवारीला मनसेकडून घुसखोऱ्यांविरोधात आंदोलन
मुंबई : पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या घुसखोरांना बाहेर काढण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या 9 फेब्रुवारीला पक्षाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, या मोर्चासाठी मनसेने मुंबई पोलिसांना दोन मार्ग सुचवले होते. त्यातील एका मार्गाला पोलिसांनी परवानगी दिली असून, मोर्चाचा मार्ग आता ठरला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या अधिवेशनात भारतातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याची मागणी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. या मागणीसाठी मनसेच्या वतीने 9 फेब्रवारीला मोर्चाचे आयोजनही करण्यात आले आहे. मात्र, मोर्चाचा मार्गाला पोलीस परवानगी देतात का? याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते.
मोर्चा काढण्यासंदर्भात मनसेने मुंबई पोलिसांना पत्र दिले होते. यात राणी बाग ते आझाद मैदान व गिरगाव चौपटी ते आझाद मैदान हे दोन मार्ग सूचवण्यात आले होते. एका मार्गाला पोलिसांनी नकार दिला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राणी बाग ते आझाद मैदान या मार्गाचा वापर न करण्याची सूचना पोलिसांनी मनसे नेत्यांना केली. त्याचबरोबर गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मार्गाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
घुसखोरांविरूद्धचा उपस्थित केल्यानंतर मनसेचा सीएए आणि एनआरसीला पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली होती. मनसेच्या भूमिकेवर अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. मात्र, नंतर स्वतः पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच यावर खुलासा केला. बेकायदा पाकिस्तानी, बांगलादेशी मुसलमानांना हाकला, असे आपण म्हणालो होतो. सीएएचे समर्थन केले नाही. आपल्या वक्तव्याचा प्रसार माध्यमांकडून चुकीचा अर्थ लावण्यात आला, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.