Ritu Tawade : नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलेले असतानाच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या एका वक्तव्याने नवी चर्चा रंगली आहे. “गुरुदेवजींच्या आशीर्वादामुळे माझ्या घशाची समस्या पूर्णपणे नाहीशी झाली,” असा दावा त्यांनी केला आहे. महावीर जयंतीनिमित्त बोरोवलीतील कोरा केंद्र मैदानावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी सांगितले की, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून त्या घशाच्या त्रासाने त्रस्त होत्या. अनेक औषधोपचार करूनही फरक पडत नव्हता. मात्र गुरुजींना आपली समस्या सांगितल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला आणि त्यानंतर आपला आवाज सुधारल्याचा अनुभव आल्याचे तावडे यांनी नमूद केले. “आज मी स्पष्टपणे बोलू शकते, हा मोठा चमत्कारच आहे. मला सकारात्मक ऊर्जा जाणवते,” असेही त्या म्हणाल्या. भगवान महावीरांच्या अहिंसेच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी आत्मजिंकणं हेच खरे शौर्य असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात समाजोपयोगी उपक्रमांचाही समावेश होता. मुंबईतील डबेवाले यांना ई-बाईक्सचे वाटप तसेच 50 दिव्यांगांना ई-ट्रायसिकल देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अमित साटम उपस्थित होते. तावडे यांच्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय व सामाजिक वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.