Mumbai High Court : पेट्रोल-डीझेलवरील वाहने टप्प्याटप्प्याने हटवा; वाढत्या वायु प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई : मुंबईतील प्रदूषणाची समस्या हा चिंतेचा विषय ठरली आहे. मुंबईतील बांधकामांसह अनेक अशा बाबी ज्या प्रदूषणास कारणीभूत ठरतात, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत. तरीही मुंबईतील वाढते प्रदूषण हे प्रशासन आणि मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अशामध्ये आता मुंबईत वाढलेल्या प्रदूषणाची उच्च न्यायालयाने दखल घेतली.
प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या व्यवहार्यतेचा निर्णय घेण्यासाठी पॅनल स्थापन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.वाहनांमुळे शहरातील हवेची गुणवत्ता खराब होत आहे. अशामध्ये मुंबईचे रस्ते असल्याचा निष्कर्ष उच्च न्यायालयाने नोंदवला आहे.
मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने मुंबईतील रस्त्यावरून पेट्रोल-डिझेलवर आधारित वाहने टप्प्याटप्प्याने हटवण्याबाबत काय व्यवहार्य तोडगा काढता येणार आहे. तसेच सीएनजी किंवा इलेक्ट्रिक गाड्या कशा वाढवता येतील? याचा विचार करण्यासाठी 15 दिवसांत तज्ज्ञ आणि नागरी प्रशासकांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.
लाकूड आणि कोळसा वापरणाऱ्या शहरामधील बेकऱ्यांनी 6 महिन्यांच्या आतमध्ये गॅस किंवा इतर हरित इंधनावरील बेकरी उत्पादने तयार करावीत, असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या संदर्भात निरीक्षण नोंदवताना न्यायालयाने म्हटले आहे की, अशा बेकरी युनिटवर तातडीची आणि प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
यामुळे शहरात मोठ्या संख्येने असलेल्या अशा युनिटमुळे वायुप्रदूषण होणार नाही, असेही खंडपीठाने नमूद केले. कोळसा किंवा लाकडावर चालणाऱ्या बेकरी किंवा तत्सम व्यवसायांना यापुढे कोणतीही नवीन मान्यता दिली जाणार नसून ग्रीन एनर्जी वापरण्याच्या अटीचे पालन केल्यानंतर नवीन परवाने देण्यात यावेत, असेदेखील खंडपीठाने नमूद केले.





