Mulshi News – मुळशी तालुक्यातून जाणार्या महामार्गांसह अंतर्गत रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने अनेक रस्त्यांना बकाल स्वरूप आले आहे. वाढते नागरीकरण, अपुरी यंत्रणा आणि कचरा व्यवस्थापनातील त्रुटींमुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. मुळशी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहत असून लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत आवश्यक रस्ते, वीज, पाणी आणि विशेषतः कचरा व्यवस्थापनाच्या सुविधा अपुर्या पडत असल्याचे चित्र आहे. वाढत्या लोकसंख्येचा ताण ग्रामपंचायतींवर येत असून उपलब्ध मनुष्यबळ आणि साधनसामग्री अपुरी पडत असल्याने प्रशासनाची मोठी कसरत होत आहे. ग्रामपंचायतींकडून कचरा संकलनासाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असली, तरी त्यांची वेळ आणि कामगारांच्या कामावर जाण्याच्या वेळा यामध्ये समन्वय नसल्याने अनेक नागरिक घरातील कचरा थेट रस्त्याच्या कडेला टाकत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी तालुक्यातील अनेक रस्ते कचरा डेपोमध्ये रूपांतरित झाले आहेत. विशेषतः कामगार वसाहती परिसरात ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. रस्त्यांच्या कडेला टाकल्या जाणार्या कचर्यामध्ये प्लास्टिक साहित्य, अन्नपदार्थ, भाजीपाल्याचा कचरा, हॉटेल व्यावसायिकांचा कचरा, हॉस्पिटलमधील टाकाऊ वस्तू तसेच दारूच्या बाटल्यांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतींकडून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात असून दंडात्मक कारवाईचाही इशारा दिला जात आहे. मात्र उघड्यावर कचरा टाकण्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजना अपुर्या पडत असल्याची टीका नागरिकांतून होत आहे. कचरा व्यवस्थापन विभागातील काही कर्मचार्यांची उदासीन वृत्तीही या समस्येला कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे. कचरा टाकणार्यांवर कठोर कारवाई, नियमित संकलन व्यवस्था आणि नागरिकांमध्ये शिस्त निर्माण करणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.