पुणे –महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) बांधलेल्या सहा विभागांतील 15 ठिकाणांची निवासव्यवस्था वर्षानुवर्षे बंद आहे. याची माहिती सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारात मागितली होती. यासाठी वेलणकर यांनी 31 जानेवारी रोजी अर्ज केला होता. त्यावर माहिती अधिकार आयोगाने 15 मार्चला खुलासा केला आहे.
महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची 1975 मध्ये स्थापना केली. त्याअंतर्गत सहलीचे आयोजन करणे, पर्यटक निवास, हॉटेल व उपाहारगृहांचे व्यवस्थापन करते तसेच पर्यटक-निवास व इतर प्रकारची वसतिस्थाने बांधने व त्याची शोभा वाढविणे इत्यादी कार्य महामंडळाचे आहे. पर्यटकांना पर्यटनस्थळी उत्तम निवास व्यवस्था वाजवी दरात उपलब्ध व्हावी यासाठी 25 ठिकाणी पर्यटन निवास बांधले आहेत. त्यासाठी किती खर्च करण्यात आला, यातील कोणत्या ठिकाणच्या निवासव्यवस्था महामंडळाने चालवायला दिल्या आहेत, किती ठिकाणच्या निवासव्यवस्था बंद अवस्थेत कधीपासून आहेत आणि तरी त्यावर किती देखभाल दुरुस्तीसाठी खर्च केला याची माहिती वेलणकर यांनी माहिती अधिकारात मागितली होती.
पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, विभागांतील निवासव्यवस्था वर्षानुवर्षे बंद अवस्थेत आहेत. यामध्ये औरंगाबाद विभागातील अजंठा, वेरुळ, औंढा नागनाथ तर नागपूर विभागात खिंडसी येथील तसेच अमरावती विभागात रिद्धपूर, चिखलदरा, बाळापूर, सिंदखेडराजा तर पुणे विभागात पाचगणी, शिखर शिंगणापूर, अक्कलकोट, सिंहगड, पन्हाळा, नायगाव या ठिकाणी आणि नाशिक विभागात तोरणमाळ या ठिकाणच्या निवास व्यवस्थांचा समावेश आहे. दरवर्षी या वसतिस्थानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च केला जातो. करोडो रुपये खर्च करून ही वसतिस्थाने नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध नसतील तर हे पैसे जातात कुठे, असा प्रश्न पडतो. तसेच यातील काही वसतिस्थाने इतर संस्थांना खासगी व्यावसायिकांना चालवायला दिली आहेत. तेथेही खासगी व्यावसायिकांकडून लूट केली जाते.
ही सर्व अत्यंत प्रसिद्ध पर्यटनस्थळे असून तिथे कायमच पर्यटकांची गर्दी असते, तरीही या ठिकाणच्या निवासव्यवस्था वर्षानुवर्षे बंद अवस्थेत असाव्यात हे आश्चर्यकारक व उद्वेगजनक आहे. या ठिकाणच्या खाजगी हॉटेल्सचा धंदा चालावा म्हणून तर जाणूनबुजून या निवासव्यवस्था बंद ठेवण्यात येत नसतील ना असा संशय येतो.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच