शेलपिंपळगाव – खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेलपिंपळगाव, बहुळ, साबळेवाडी, सिद्धेगव्हाण, चींचोशी, दौंडकरवाडी, मोहितेवाडी, शेलगाव, भोसे व वडगाव घेनंद या गावातील शेतकऱ्यांना महावितरणने वीज बिल न भरल्याने 30 पेक्षा अधिक रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बंद करून शेतकऱ्यांना झटका दिला आहे.
विजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडीत करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयास दिल्याने भोसे येथील कार्यालयाच्या मार्फत 30 पेक्षा अधिक रोहित्रांची वीज खंडित केली गेली असल्याने या भागातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. हाताशी आलेली कांदा, फ्लॉवर, कोबी, मेथी, कोथिंबीर, पालक, वांगी, बटाटा पिके पाण्याअभावी जळून जाण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहे.
जर लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पंपांची विजजोड केली नाही तर शेतकरी आक्रमक होत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकत सत्ताधारी राज्यकर्त्यांना जागा दाखवून देईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ पाहत असल्याचा सूर ही शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.
80 कोटींपेक्षा अधिक थकबाकी
ज्या रोहित्रावरील 80 टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी वीज बिल वेळेत भरले नसेल अशा रोहित्रांची वीज खंडित केली आहे. विभागातील थकबाकीदार अनेक शेतकऱ्यांच्या शेती पंपांची वीज खंडीत करण्यात आली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला मोबाइलवर एस. एम. एस. मार्फत नोटीस बजावण्यात आल्यानंतरच वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. भोसे विभागातून 80 कोटींपेक्षा अधिक थकबाकी शिल्लक असून आजपर्यंत 30 लोखांपेक्षा अधिक वसुली झाल्याची माहिती भोसे शाखाचे सहायक कार्यकारी अभियंता माटे यांनी दिली.
राज्य सरकारने दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला असून लवकरात लवकर वीज जोडणी केली नाही तर मनसे स्टाईलने महावितरण कार्यालयात घुसून आंदोलन करेल.
– तुषार बवले, अध्यक्ष, खेड तालुका, मनविसे
लॉकडाऊन काळातील सहानभूती संपली असे म्हणत महावितरणने वीजग्राहक शेतकऱ्यांना जो झटका दिला. अनेक शेतकऱ्यांची वीज खंडित केली. याच्या निषेधार्थ शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहे.
– एकनाथ आवटे, माजी उपसरपंच शेलगाव
कोणत्याही शेतकऱ्याला नोटीस न देता विजजोड अचानक तोडलेच कसे? राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत वीज बिल भरणा करण्यासाठी मुदत दिली असता आधीच वीजतोड करून महावितरण शेतकऱ्यांची अडवणूक करत आहे.
– प्रवीण हांडे, शेतकरी