औंध -मी पुन्हा येईल…, आपल्याला या ठिकाणी एकत्रित काम करून नव्याने पुणे महानगरपालिकेमध्ये सामाविष्ट झालेल्या गावांमध्ये लोकप्रतिनिधींना निवडून द्यायचे आहे. गावांचा विकास करायचा आहे, यासाठी मी पुन्हा येईल…, असे प्रतिपादन महाळुंगे येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.
महाविकास आघाडी ही खऱ्या अर्थाने महाळुंगे गावात दिसून येत आहे. या ठिकाणी खासदार राष्ट्रवादीचे, आमदार कॉंग्रेसचे तर सरपंच हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे आता महानगरपालिकेमध्ये देखील या ठिकाणी महाविकास आघाडीचेच नगरसेवक निवडून आणायला पाहिजेत. आपण, महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली ती कायमस्वरूपी ठेवण्यासाठीच आपण एकत्र आलो आहोत.
खासदार राऊत म्हणाले की, लोकप्रतिनिधी हा एकदा निवडून आला की तो कुठल्याही पक्षाचा नसतो तो सर्वांचा असतो, तो गावाचा असतो, राज्याचा असतो तसेच देशाचाही असतो. त्यामुळे लोकप्रतिनिधीने निवडून आल्यानंतर कुणाच्याही बाबतीत कटुता न ठेवता सर्वांना एकत्रित घेऊन विकासकामे केली पाहिजेत. आपण मराठी लोक संकुचित नाही, आपली मनं मोठी आहेत. आपण सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो म्हणून महाराष्ट्र मोठा आहे. यामुळे देशांमध्ये महाराष्ट्राला मान मिळतो.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे जिल्हा संपर्क नेते बाळाभाई कदम, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती गणेश कळमकर, विजय डाकले, बाळासाहेब भांडे, गणेश कवडे, डॉ. दिलीप मुरकुटे, प्रल्हाद सायकर तसेच महाळुंगे ग्रामपंचायत सदस्य व महाळुंगे गावातील नागरिक उपस्थित होते.