कोल्हापूर – गेल्या पाच वर्षात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली. राजधानी दिल्लीत भाजपने ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोदी यांनी यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात काहीच कामे केली नाहीत त्यामुळे ते शाह यांच्या बाजूला बसून राहिले. देशातील नागरिकांनी मोदींना संधी दिली होती मात्र त्यांनी ती गमावली आहे” अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या निवडणुकीपेक्षा शंभर ते सव्वाशे जागा भाजपच्या कमी होतील असा दावा देखील राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचा उदो-उदो करणे म्हणजे भाजप हे कोणत्या मानसिकतेतील आहेत हे देशानं आता पाहिलं आहे, असा टोला देखील राजू शेट्टी यांनी मोदीं यांना लगावला आहे.