पुण्याचे खासदार गिरीशजी बापट यांचा 3 सप्टेंबर रोजी 72 वा जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा व जीवनाचा अल्पपरिचय शेखर मुंदडा यांनी करून दिला आहे.
आपल्या जन्मदिनी बुके व पुष्पगुच्छ, बॅनरबाजी यात न रमता ते प्रत्येकाला सेवाकार्य देत असतात. त्यातून समाजातील वंचित व दुर्बल घटकाला मदत व्हावी, हीच त्यांची अपेक्षा असते. असे जाणते व लोकप्रिय व्यक्तिमत्त्व पुण्याला लाभले ही असंख्य पुणेकरांची भावना हीच त्याच्या कार्याची पावती आहे.
राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेल्या गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. आजही पुण्यातील स्थानिक राजकारणात गिरीश बापट यांचा मोठा दबदबा आहे. थोडक्यात काय तर तळापासूनचा प्रवास बापट साहेबांचा आहे.
गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर बापट 1973 मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. त्यानंतर दोन वर्षांतच आणीबाणीमध्ये 19 महिन्यांचा कारावास नाशिक जेलमध्ये त्यांनी भोगला.
आणीबाणीच्या काळात तुरुंगात शिक्षा भोगून आल्यानंतर गिरीश बापट यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. 1983 मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याच काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.
1995 मध्ये त्यांनी आमदारकीची निवडणूक लढविली अन् पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा निवडून आले. 1996 साली त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट साहेबांचा पराभव झाला. 2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, 2019 मध्ये योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी तिकीट आणि विजयही मिळवला.
दांडगा जनसंपर्क आणि सर्वपक्षीय कनेक्शन
गिरीश बापट हे पुण्याच्या राजकारणात सर्वसमावेशक राजकारणासाठी ओळखले जातात. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपले काम साधून घेण्याचे कसब गिरीश बापट यांना उत्तम अवगत आहे. दांडगा लोकसंपर्क ही गिरीश बापट यांची जमेची बाजू. शहराच्या विकासासाठी ते अत्यंत जागरुक असतात. आपल्या आयुष्यातील सर्वाधिक वेळ कुटूंबापेक्षा आपल्या परिसराच्या विकासासाठी काय करता येईल यात ते घालवतात.
त्यांनी राजकारणाला कधीही व्यावसायिक स्वरुप दिले नाही. प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांची ना संपत्ती कमी झाली ना वाढली. आजही ते कसबा पेठेतील आपल्या सदनिकेत वास्तव्यास आहेत.
स्पष्टवक्तेपणा हा एक कमालीचा विशेष गुण त्यांच्याकडे आहे. एखादे काम होणार असेल तरच थेट ते हो किंवा नसेल होणार तर नाही म्हणून सांगून मोकळे होतात. कधी त्यांनी केलेल्या कामाची फ्लेक्सबाजी अथवा पेपरबाजी केली नाही. कित्येक रिक्षाचालक, स्टॉल धारक,बांधकाम मजूर यांना ते आपलेसे वाटतात कारण कोणत्याही समस्या अथवा अडचणीत बापट जणू विघ्नहर्ता म्हणून त्यांच्या पाठीशी सदैव उभे असतात.
कसबा पेठ गणपती उत्सवाचे ते अनेक वर्ष प्रमुख म्हणून देखील कार्यरत आहेत. आर्ट ऑफ लिविंगच्या अनेक उपक्रमांना नेहमी उपस्थित असतात. वारकरी संप्रदायाशी देखील त्यांचे अतूट नाते आहे. त्यांच्या भविष्यातील राजकीय, सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभकामना देत त्यांच्या उत्तम आयु आरोग्यासाठी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना.
(लेखक हे सामाजिक स्वयंसेवी संस्थांची शिखर संस्था महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक व सेवा प्रकोष्ठ, भाजप यांचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. एनआरडीसीचे संचालक म्हणून ते देशभर कार्यरत आहेत.)