– पौर्णिमा रणपिसे सावंत
एमव्हीबी मीडियानिर्मित जिओ स्टुडिओ प्रस्तुत “बाईपण भारी देवा’ प्रदर्शित झाला व कमी वेळेत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. चित्रपटाच्या नावावरूनच या चित्रपटाने प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव “मंगळागौर’ असे ठेवण्यात आले होते. परंतु या नावावरून चित्रपट कोणत्यातरी देवीचा किंवा धार्मिक कथेवर आहे असा प्रेक्षकांचा समज होईल म्हणून या चित्रपटाचे नाव बदलण्याचा विचार करण्यात आला व चित्रपटाचे सहनिर्माते अजित भुरे यांनी “बाईपण भारी देवा’ हे नाव पक्के केले.
“बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सहा बहिणींची कथा आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी (जया), वंदना गुप्ते (शशी), सुकन्या मोने (साधना), सुचित्रा बांदेकर (पल्लवी), शिल्पा नवलकर (केतकी) व दीपा परब चौधरी (चारू) महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. या सहाही बहिणी मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येतात व त्यानिमित्ताने एकमेकींच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणींना एकमेकींना मदत करत सामोरे जातात. जन्माअगोदरच स्वतःचे बाळ हरवून बसलेली जया नेहमीच निराश दिसत असते. तर शशी स्वतःच्या एकुलत्या एका मुलीला तिच्या सासूसोबत चांगले वागताना पाहू शकत नाही. आपली मुलगी दुसऱ्या कोणाचे तरी गोडवे गाते हे तिला सहन होत नाही. साधना जी स्वतःच्याच बहिणीच्या हाताखाली काम करत आहे. घर, संसार सांभाळताना तिच्या आवडीनिवडी तिने पार सोडून दिल्या आहेत. पल्लवी जी यशस्वी उद्योजक असूनही स्वतःच्या पतीला स्वतःपासून दूर जाताना वाचवू शकत नाही व त्यामुळे तिचा झालेला भ्रमनिरासपणा. केतकी जिला कुटुंबात एक स्त्री म्हणून अजिबात मान नाही व चारू जी उद्योगात तोटा झालेल्या नवऱ्याला वर आणण्याचे प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे सर्वजणी संकटातून मार्ग काढण्यासाठी “मंगळागौर’ या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी एकत्र येतात.
“बाईपण भारी देवा’ या गीताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच “पिंगा ग पोरी पिंगा’, “जय देवी मंगळागौरी’ ही गीते महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडवितात. प्रत्येक अभिनेत्रीने स्वतःच्या अभिनयाने वेगळीच छाप टाकली आहे. छोट्या छोट्या गोष्टी विनोदी शैलीतून दाखवण्याचे कसब वंदना गुप्ते यांच्यामध्ये दिसून येते. माईंच्या (रोहिणी हट्टंगडी) पतीची भूमिका करणारे अभिनेते सतीश जोशी स्वतःच्या सहज सुंदर अभिनयाने आपली वेगळीच छाप उमटवतात. सुकन्या मोने यांनी साकारलेली प्रेमळ तसेच धांदरट “साधना’ जणू काही आपल्याच कुटुंबातील एक व्यक्ती वाटते. सततच्या घर, ऑफिस, नवरा यांच्या तणावामुळे अकाली रजोनिवृत्त झालेली दीपा परब (चारू) असहायतेचे दर्शन घडवते. बाई स्वतः कमावत नसेल तर घरात तिला मिळणारी किंमत शिल्पा नवलकर उत्तम प्रकारे मांडते. या चित्रपटातून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सामान्य माणसाच्या भावविश्वाला चांगल्या प्रकारे उलगडले आहे.