पालिकेकडून कचऱ्याचे ओपन डंपिंग केले जात असल्याचा आरोप
फुरसुंगी – राष्ट्रीय हरीत लवादाचा आदेश डावलून फुरसुंगी-उरुळी देवाची कचराडेपोत पालिकेकडून कचऱ्याचे ओपन डंपिंग केले जात असल्याने दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी आज सकाळी कचराडेपोवर जाऊन आंदोलन केले.
महापालिका प्रशासनाने दि. 2 जानेवारी पासूनच ओपन डंपिंग बंद केल्याचा दावा केला आहे. ग्रामस्थ व पालिका प्रशासन परस्परविरोधी दावे करत असल्याने कचरा डेपोचा प्रश्न चिघळून शहरात कचराकोंडी होणार की पालिकेचा यावर तोडगा काढणार, असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.
फुरसुंगी व उरुळी देवाची गावच्या ग्रामस्थांनी आज सकाळी नऊच्या वातता पुणे महापालिकेच्या कचराडेपोवर एकत्र येत आंदोलन केले. कचराडोपो संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे म्हणाले की, पुणे महापालिकेने नागरी घनकचरा अधिनियम 2000च्या निर्देशानुसार व राष्ट्रीय हरीत लवादाने दिलेल्या आदेशानुसार कचराडेपोचे व्यवस्थापन व प्रोसेसिंग करावे.याठिकाणी एक किलोसुध्दा कचरा उघड्यावर टाकूनये, असे आदेश असताना पालिकेकडून राजरोसपणे ओपन डंपिंग केले जात आहे.
गेली 27 वर्षे आम्ही कचराडेपोच्या नरकयातना सोसत आहोत, न्यायालयाने आदेश दिलेला असताही पालिकेकडून उपाययोजना होत नाही. दोन्ही गावचे हवा, पाणी दूषित झाले आहे. आता, ओपन डंपिंग कायमचे बंद झाल्याशिवाय माघार नाही, अशी भुमिका आम्ही घेतली असल्याचे भाडळे यांनी सांगितले. फुरसुंगीचे ग्रामस्थ विशाल हरपळे म्हणाले की, गेल्या 23 वर्षांपासून आम्ही या कचरा डेपोविरोधात लढा देत आहोत, प्रत्येकवेळी पालिकाप्रशासनाने काही ना काही गाजर दाखवून वेळ मारुन नेली आहे. यावेळी मात्र, असे होणार नाही.
न्यायालयाने दिलेल्या आदेश पालिका प्रशासनाकडून डावलला जात असल्याने पोलिसांनही पालिका अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करावेत. यावेळी दिलीप मेहता, तात्यासाहेब भाडळे, विजय भाडळे, अनंता भाडळे, फुरसुंगीचे माजी उपसरपंच संजय हरपळे, विशाल हरपळे, राहुल शेवाळे, चंद्रकांत हरपळे, प्रवीण हरपळे, बाबासाहेब ढोणे, सोमनाथ यादव उपस्थित होते.
फुरसुंगी-उरुळी देवाची कचराडेपोवर होणारे ओपन डंपिंग दि. 2 जानेवारीपासुनच बंद पालिकेकडुन आहे. संपुर्ण शहरात दोन हजार मेट्रीक टन कचरा निर्माण होत असून या सर्व कचऱ्यावर वेगवेगळ्या ठिकाणी प्रक्रिया केली जाते. फुरसुंगी-उरुळीदेवाची कचराडेपोत बायो मायनिंग प्रकल्पात एक हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, त्यातुन निघणारे रिजेक्शन दहा टक्के असते. शहर व डेपोतील प्रक्रिया प्रकल्पातून निघणारे सरासरी 200 टन रिजेक्शन कचराच येथे टाकला जातो, येथे कोणताही नविन कचरा डंपिंग केला जात नाही.
– राजेंद्र तिडके, अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभाग