औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे झालेल्या भीषण अपघातात आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन बालकांसह मुलगा गंभीर जखमी झाला आहे. चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. शेंद्रा एमआयडीसी मुख्य रस्त्यावरील हर्मन कंपनीसमोर हा अपघात झाला.
या अपघातात कचराबाई जाधव (वय 60) यांचे निधन झाले असून अनिल जाधव (35), छकुली अनिल जाधव (12), तर बंटी अनिल जाधव (10), हे जखमी झाले आहेत. हे सर्व नाथनगर, वडखा, ता.औरंगाबाद येथील रहिवाशी आहेत.
अनिल जाधव हे आपल्या दुचाकीवरून जालना महामार्गाकडे आई व मुलांसह जात होते. यावेळी हर्मन चौकात भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिली.ही धडक एवढी जोराची होती की चारचाकीची एअरबॅग उघडली गेली व दुचाकी सुमारे 60 फुट उंचीवर जाऊन पुन्हा दुभाजकावर आदळली. घटनेनंतर चारचाकी चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे.
दरम्यान, काही प्रत्यक्षदर्शींनी जखमींना रुग्णालयात पोहोचवले. उपचारापुर्वीच कचराबाई यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. तर अनिल जाधव यांचे दोन्ही पाय निकामी झाले असुन दोन्ही मुलं गंभीर असल्याचे समजते.