परळीत बिहारपेक्षा जास्त गुंडगिरी! 122 केंद्रावर फेरमतदानाची ‘मविआ’ उमेदवार राजेसाहेब देशमुखांची मागणी

बीड – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी परळी विधानसभा मतदारसंघातील 122 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याची मागणी केली आहे. परळी विधानसभा मतदारसंघात लोकशाही मार्गाने मतदान झाले नाही. त्यामुळे येथील 122 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात यावे, असे ते म्हणाले. या प्रकरणी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गुंडगिरी केल्याचाही आरोप केला आहे. मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान झाले. त्यात परळी विधानसभा मतदारसंघात हाणामारी व तोडफोडीच्या काही घटना घडल्या. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी शरद पवार गटाचे आपले प्रतिस्पर्धी उमेदवार राजेसाहेब देशमुख व त्यांच्या मुलावर मतदारसंघात दहशत निर्माण करण्याचा आरोप केला.
देशमुख यांनी गुरुवारी त्यांचा हा आरोप फेटाळत परळीत धनंजय मुंडे यांचीच दहशत असल्याचा पलटवार करत 122 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याची मागणी केली. परळीत बिहारपेक्षा जास्त गुंडगिरी सुरू आहे. येथील मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कनेक्शन काढण्यात आले. त्यानंतर परळीच्या बँक कॉलनी परिसरात माधव जाधव व देशमुख यांच्या अंगरक्षकांना मारहाण झाली.
धनंजय मुंडे यांच्या लोकांनी मतदान केंद्रावर तोडफोड केली. त्यानंतर माझ्या मुलासह पुतण्यावर गुन्हा दाखल केला. परळीत लोकशाही मार्गाने मतदान झाले नाही. त्यामुळे परळी तालुका व शहरातील 122 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी राजेसाहेब देशमुख यांनी निवडणूक आयोगाकडे केली.
माधव जाधवांना मारहाण –
उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी माधव जाधव यांना काल परळीत मारहाण झाली होती. यासाठी त्यांनी धनंजय मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांना जबाबदार धरले होते. ते म्हणाले होते, परळी मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर देशमुख व मी मतदारसंघात आढावा घेत फिरत होतो. त्यावेळी जलालपूर येथील बूथ कॅप्चर करण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले. त्यानंतर बँक कॉलनी परिसरातील बूथही कॅप्चर झाले. ही गोष्ट पोलिसांपुढे घडत होती. पण त्यानंतरही त्यांनी बघ्याची भूमिका घेतली.





