उजनी जलाशयात विनापरवाना मासेमारी
पाणलोट क्षेत्राजवळील गावांत सामाजिक शांतता भंग
इंदापूर – महाराष्ट्रातील मोठ्या धरणांमध्ये नोंद असलेले व राज्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या उजनी धरणाची सुरक्षितता सध्या धोक्यात आली आहे.
राज्यातील महत्त्वाच्या पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यांसह उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणात मोठ्या प्रमाणात परराज्यातील मच्छिमार सर्रास मासेमारी करीत आहेत. उजनी काठावरील गावात काही गावगुंडांनी कर्नाटक, आंध्र प्रदेशसह देशातील इतर राज्यांतील नागरिकांना उजनी धरण भागात आणून मोठ्या प्रमाणात विनापरवाना मासेमारी करीत असल्याचे चित्र आहे.
विशेष बाब म्हणजे मच्छिमारांची कसलीच माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाकडे अथवा स्थानिक पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांच्याकडे उपलब्ध नाही. हे मच्छिमार बिनधास्त उजनी धरणाच्या क्षेत्रात व धरणाच्यानजीक मासेमारी करतात. त्यामुळे या मच्छिमारांच्या आडून अनुचित प्रकार केल्यास नेमके कोणाला जबाबदार धरायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उजनी धरणाच्या पाण्यावर तीनही जिल्ह्यांचे अर्थकारण बनले आहे. याच उजनी धरणामुळे हजारो नागरिकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत आहे.
उजनी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात अनोळखी नागरिक मांगूर मासे पैदास, लहान मस्त्य बीज पकडणे व काही प्रमाणात मासेमारी आदी उद्योग विनापरवाना करीत आहेत. या नागरिकांची कसलीच माहिती उपलब्ध नसल्याने अनेकवेळा या नागरिकांची भांडणे, हाणामाऱ्याचे प्रकार होत आहेत. याचा नाहक त्रास विद्युतपंप सुरू करण्यासाठी जाताना शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
– शेतकरी, स्थानिक मच्छिमार त्रस्त
उजनी धरणाला धोका पोहोचल्यास पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यातील नदीकाठावरच्या तालुक्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. या भागातील शेतकरी आणि नागरिक देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे उजनी धरणाजवळ मासेमारी करण्यास बंदी घालण्यात यावी, उजनी धरणाची सुरक्षितता वाढवण्यात यावी व उजनी धरणात मासेमारी करणाऱ्या सर्वच मच्छिमारांची नोंद करावी, आदी प्रश्न प्रशासनाने सोडविणे गरजेचे आहे. नदीकाठावरील गावातील किमान पोलीस पाटील व ग्रामपंचायतीकडे मच्छिमारांची ओळखपत्रासह नोंद नाही. कठोर कारवाई केल्यास उजनी धरणाच्या भागात होणाऱ्या अनुचित प्रकाराला आळा बसणार आहे. याशिवाय धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय प्रशासनास घेणे आवश्यक असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यामुळे उजनी धरणाच्या सुरक्षिततेबाबत कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.