अहमदनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शिर्डीत तब्बल 7500 कोटींच्या प्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पण करणार आहे. शिर्डीत येणाऱ्या देश- विदेशातील भाविकांना सुकर आणि सुरक्षित दर्शन घेता यावे. यासाठी साई संस्थानने 109 कोटी रुपये खर्चून वातानुकूलित तीन मजली दर्शनरांग प्रकल्प तयार केला आहे. या दर्शनरांगेच्या माध्यमातून दिवसभरात एक लाख भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. या धरणावर मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात येणार आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना त्यांना विनंती केली आहे
उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहेत तर त्यांचं स्वागत आहेच. त्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा विषय सोडवावा ही माझी त्यांना विनंती आहे”, अस ठाकरे यावेळी म्हणाले. ‘मराठा आरक्षणा’वर खूप लोकांनी बोलून गोंधळ घालू नये”, असेही ही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, काकडी येथील शेतकरी मेळाव्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या योजनेते महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 86 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम देऊन त्यांना लाभ दिला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता वर्षाला 12 हजार रूपयांची मदत मिळणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील 86 लाख शेतकऱ्यांना 1712 कोटी रूपयांच्या पहिल्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण केले जाणार आहे.