Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणूक २०२५ ची मतमोजणी सध्या सुरु असून, आतापर्यंतचे कल एनडीएच्या बाजूने दिसत आहेत. आतापर्यंतचे ट्रेंड्स पाहता, एनडीए २०३ जागांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे, तर महागठबंधन केवळ ३४ जागांवर आघाडीवर आहे. या विजयी आघाडीवर भाजपने देशभरात जल्लोष साजरा केला असून, विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली आहे. निवडणुकीच्या ट्रेंडनुसार सर्व एनडीए पक्ष २०३ जागांवर आघाडीवर आहेत. भाजपकडे ९२ जागा, नितीश कुमार यांच्या जेडीयूकडे ८३, चिराग पासवान यांच्या एलजेपीआरकडे २१ जीतन राम मांझी यांच्या एचएएमकडे ४ आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएमकडे ४ जागा आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा भाजपकडे ९२ असल्याचं दिसून येत आहे. या अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. बिहार निवडणुकीत एनडीएला प्रचंड बहुमत मिळालं. बिहार निवडणुकीच्या निकालातून मोदींचा करिष्मा पाहायला मिळाला. त्यानंतर आता मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. बिहार निवडणुकीतील विजयानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. “सुशासनाचा विजय झाला आहे. विकासाचा विजय झाला आहे. जनकल्याणाच्या भावनेचा विजय झाला आहे. सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे,” असं पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय मिळवून दिल्याबद्दल मी राज्यातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो. हा प्रचंड जनादेश आम्हाला जनता-जनार्दनांची सेवा करण्याची आणि बिहारसाठी नव्या संकल्पाने काम करण्याची ताकद देणारा आहे”, असंही मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी राज्यातील जनतेला विविध विकासकामांचं आश्वासन दिलं आहे.