नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत माझी चौदा हजार कोटी रूपयांची संपत्ती जप्त केल्याची माहिती दिली आहे. मी भारतातील बॅंकांचे नऊ हजार कोटी रूपये देणे लागतो. त्याऐवजी सरकारने चौदा हजार कोटी रूपये माझ्याकडून वसुल केले असतील तर माझ्याकडे काय बाकी राहिले असा सवाल विजय मल्ल्या याने ट्विटरवर केला आहे. भाजपने मला त्यांचा पोस्टर बॉय बनवले असल्याचा निशाणाही त्याने साधला आहे.
माझ्यावर जे कर्ज आहे त्याच्यापेक्षा जास्त रकमेची जप्ती सरकारने केली असेल तर मी त्यांचे आता काहीहीं देणे लागत नाहीं असा त्याच्या म्हणण्याचा सूर होता. त्याने आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे की मी 1992 पासून ब्रिटनचा रहिवासी आहे आणि मी कर्ज बुडवून पळून गेल्याचा खोटा दावा भाजपचे लोक करीत राहिले आहेत असे त्याने म्हटले आहे. मोदींनी रिपब्लीक चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आपल्या सरकारने मल्ल्याची चौदा हजार कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती दिली होती. त्या संबंधात मल्ल्याने याने हे विधान करताना आता मोदी सरकारने मला निर्दोष मुक्त केले असल्याची भावनाही व्यक्त केली आहे. मोदींच्याच सांगण्यावरून माझे पुर्ण कर्ज वसुल झाले असेल तर भाजपचे प्रवक्ते अजून माझ्या नावाने का व्यर्थ बडबड करीत आहेत असा सवालही त्याने व्यक्त केला आहे.