Modi-Putin: भारत-रशियामध्ये कोणते करार झाले; पीएम मोदींनी पत्रकार परिषदेत दिली माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात आज, शुक्रवारी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे झालेल्या 23 व्या शिखर परिषदेनंतर अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना भारत-रशिया संबंधांना बळकट करण्याची आणि 2030 पर्यंत आर्थिक सहकार्याचा नवा टप्पा गाठण्याची ग्वाही दिली.
रशियन नागरिकांसाठी मोफत व्हिसा सुविधा –
पंतप्रधान मोदींनी या परिषदेत रशियन नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यानुसार, लवकरच रशियाच्या नागरिकांसाठी 30 दिवसांचा मोफत ई-पर्यटन व्हिसा (e-Tourist Visa) आणि 30 दिवसांचा सामूहिक प्रवासी व्हिसा (Group Tourist Visa) सुरू करण्यात येणार आहे. यामुळे दोन्ही देशांतील नागरिक स्तरावरील संपर्क वाढण्यास मदत होईल, असे मत मोदींनी व्यक्त केले.
2030 पर्यंत आर्थिक सहकार्यावर लक्ष –
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, दोन्ही देशांनी 2030 पर्यंत आर्थिक सहकार्याचा एक कार्यक्रम निश्चित केला आहे. यामुळे व्यापार आणि गुंतवणूक संतुलित व टिकाऊ पद्धतीने वाढेल आणि सहकार्याच्या क्षेत्रात नवीन आयाम जोडले जातील. याशिवाय, दोन्ही नेते व्यापार-गुंतवणूक मजबूत करण्यावर आणि भारत-रशिया व्यापार मंचाला प्रोत्साहन देण्यावर सहमत झाले आहेत.
ऊर्जा, खनिजे आणि कनेक्टिव्हिटीवर भर –
मोदींनी ऊर्जा सुरक्षा आणि महत्त्वाच्या खनिजांवरील (Critical Minerals) सहकार्याला भारत-रशिया भागीदारीचा मजबूत आणि महत्त्वाचा पैलू असल्याचे अधोरेखित केले. दोन्ही देश ‘विन-विन’ (Win-Win) सहकार्य सुरू ठेवणार. या सहकार्यामुळे स्वच्छ ऊर्जा आणि हाय-टेक उत्पादन क्षेत्रात भागीदारीला बळ मिळेल. दोन्ही देशांदरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवणे ही मुख्य प्राथमिकता राहील. दोन्ही पक्ष अन्न सुरक्षा आणि शेतकरी कल्याणासाठी युरिया उत्पादनाचे प्रयत्न एकत्र करणार आहेत.
विद्यार्थी आणि खेळाडूंचे आदान-प्रदान
पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांमध्ये व्यावसायिक शिक्षण, कौशल्य विकास आणि प्रशिक्षण (Vocational Education, Skilling, and Training) यावर एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. यासोबतच, दोन्ही देशांतील विद्यार्थी आणि खेळाडूंच्या आदान-प्रदानाला चालना दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक आणि क्षेत्रीय मुद्द्यांवर चर्चा –
प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाली. युक्रेनच्या संदर्भात भारताने सुरुवातीपासूनच शांततेच्या बाजूने भूमिका घेतली आहे. शांततापूर्ण आणि स्थायी समाधानासाठी सुरू असलेल्या सर्व प्रयत्नांचे भारत स्वागत करतो आणि भविष्यातही आपले योगदान देण्यास तयार राहील, असे मोदींनी स्पष्ट केले. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारत आणि रशियाने नेहमीच खांद्याला खांदा लावून सहकार्य केले आहे. दहशतवाद हा मानवतेच्या मूल्यांवर थेट हल्ला असून, या विरोधात जागतिक एकता हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे, असा भारताचा ठाम विश्वास आहे. संयुक्त राष्ट्र, जी-20, ब्रिक्स, एससीओ आणि इतर मंचांवर भारत आणि रशियामध्ये जवळचे सहकार्य आहे, जे पुढेही सुरू राहील.
पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आभार मानले आणि त्यांच्या नेतृत्वाने दोन्ही देशांतील संबंधांना नवीन उंची दिली, असे सांगितले. येणाऱ्या काळात दोन्ही देशांतील मैत्री जागतिक आव्हानांचा सामना करण्याची शक्ती देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





