नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करताना कसलाही विचार केला नव्हता. हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्याकडे कोणतीही ठोस योजना नव्हती. लॉकडाऊनमुळे देशभरातील मजूर आणि स्थलांतरित कामगारांचे काय होईल, ही शक्यताच मोदींनी विचारात घेतली नव्हती, अशी टीका एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी केली.
काही दिवसांपूर्वीच तेलंगणावरून छत्तीसगढला जात असताना एका 12 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. तिने 150 किलोमीटरचा प्रवास पायी केला होता. देशभरात स्थलांतरित कामगारांची हीच परिस्थिती आहे. अनेकजण लॉकडाऊनमुळे आपल्याला स्वत:च्या घरी पोहोचता येणार नाही, या भीतीने आत्महत्या करत असल्याचे ओवेसी यांनी सांगितले. या स्थलांतरित कामगारांपैकी अनेकांची बॅंक खाती नाहीत, त्यांच्याकडे रेशनकार्डही नाही. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्या आधारकार्डाचा क्रमांक ग्राह्य धरून त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ओवेसी यांनी केली.
तसेच सरकारी गोदामांमध्ये पडून असलेल्या तांदळपासून सॅनिटायझर तयार करण्याऐवजी तो गरिबांना वाटण्यात यावा. तसेच केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या प्रकल्पांचा निधी गरजू लोकांची मदत करण्यासाठी वळवण्यात यावा, असा प्रस्तावही ओवेसी यांनी मांडला.