नवी दिल्ली – सेमीकंडक्टर आणि मोबाईलसाठी लागणाऱ्या इतर सुट्या भागाचा प्रश्न वाढला आहे. त्यामुळे भारतात उत्सवाच्या काळात नव्या स्मार्टफोनचे लॉन्चिंग कमी होणार आहे. याचबरोबर काही उत्पादकांना आपल्या उत्पादनाच्या किमती सात ते दहा टक्क्यांनी वाढवाव्या लागणार आहेत.
करोनानंतर अनेक उपकरणांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टरचा वापर वाढल्यामुळे मागणी वाढली आहे. तर उत्पादन वाढलेले नाही. या बाबीचा पुरवठा मुख्यतः चीनमधून होतो. चीनमधून वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे वाहन कंपन्यांबरोबरच मोबाईल कंपन्या वर परिणाम झशला आहे.
काउंटर पॉईंट रीसर्च या संस्थेचे संचालक अरुण पाठक यांनी सांगितले की, जरी किमती वाढल्या तरी स्मार्टफोनची मागणी कमी होणार नाही. हा तुटवडा नजीकच्या भविष्यात कमी होण्याची शक्यता मंदावली आहे. स्मार्ट फोनची गरज पाहून सेमीकंडक्टर उत्पादक स्मार्टफोन कंपन्यांना प्राधान्यक्रमाने सेमीकंडक्टर देत असल्या तरी मागणी इतकी जास्त आहे की कमतरता भासत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने गेल्या आठवड्यात आपला स्वस्त स्मार्टफोन जारी करण्याचे ठरवले होते. मात्र सेमीकंडक्टरचा तुटवडा इतका जास्त आहे की कंपनीला हे लॉन्चिंग पुढे ढकलावे लागले आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात सेमीकंडक्टरला मागणी वाढली आहे. त्यामुळ फोनबरोबरच इतर अनेक उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे.