MNS Raj Thackeray । मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा दिलाय. फक्त नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा असणार आहे, अशी मोठी घोषणा त्यांनी शिवतीर्थावर आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, मला कशाचीही अपेक्षा नाही, देशाच्या भवितव्यासाठी सक्षम नेतृत्व हवे म्हणून केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर देखील हल्लाबोल केला. तुमचा पक्ष फोडला म्हणून तुम्ही आरोप करता, पण सत्तेत असताना तुम्ही मलाई खाल्ली नाही का, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना केला.
आमच्या पक्षचिन्हावर निवडणूक लढा MNS Raj Thackeray ।
राज ठाकरेंनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीत किती आणि कोणत्या जागा लढवणार, मनसेने कोणत्या जागांसाठी आग्रह धरला आहे? यावर वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. त्या चर्चांचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले, होय! जागावाटपावर चर्चा झाली. मात्र मला अशा चर्चा जमत नाहीत. मी खरं सांगतो, मी जागावाटपाच्या चर्चेला १९९५ साली शेवटचा बसलेलो. त्यानंतर आजतागायत मी अशा चर्चेला बसलो नाही. कारण अशी चर्चा करणं मला शक्यच नाही. तू दोन जागा घे, चार जागा मला दे, ही जागा मला नको, ती जागा तू घे, मला इथे सरकव, तू तिथे जा… असली चर्चा मला कधीच जमणार नाही. माझ्याच्याने हे होणार नाही. त्यानंतर मला सांगण्यात आलं की, आमच्या पक्षचिन्हावर निवडणूक लढा, मी त्यांना (भाजपा) स्पष्ट सांगितलं ते होणार नाही.
मनसेचं रेल्वेइंजिन महाराष्ट्र सैनिकांच्या कष्टाने कमावलं MNS Raj Thackeray ।
मनसे अध्यक्ष म्हणाले, मनसेचं रेल्वेइंजिन हे पक्षचिन्ह मी महाराष्ट्र सैनिकांच्या कष्टाने कमावलं आहे. हे चिन्ह माझ्याकडेआयतं आलेलं नाही. सहज आलंय चिन्ह म्हणून मी त्यावर लढायचं असं अजिबात नाही. पक्षचिन्हावर कसलीही तडजोड होणार नाही. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी ‘दिल्लीत जाणारा पहिला ठाकरे’ अशी बातमी दाखवली. खरंतर या पत्रकारांना काही माहिती नसतं. अनेक नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत असतात. कोणी कोणाला भेटल्याने लहान-मोठा होत नसतो. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील दिल्लीत जाऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस नेते संजय गांधी यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला येऊन भेटले होते. अशा भेटींमुळे कोणी लहान-मोठं होत नाही. भेटायला जाण्यात कसला कमीपणा?