शिर्डी – ‘जसा पाण्यावीना मासा फडफडतो, तशी सत्तेविना भाजपची अवस्था झाली आहे’ अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केली. निलेश लंके हे शिर्डी जवळील राहाता शहरात आपल्या जुन्या मित्रांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर निशाना साधला.
लंके म्हणाले, ‘भाजपने अपयश का आले याचा विचार केला पाहिजे. आता सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आता सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने विरोधी पक्षाची भूमिका स्विकारून काम केले पाहिजे, पण जसा मासा पाण्यातून बाहेर काढल्यावर फडफड करतो तशी अवस्था सत्तेत न आल्यामुळे भाजपची झाली आहे, अशी टीका लंके यांनी केली.
तसेच ‘राजकारणात यश आणि अपयश या दोन गोष्टी असतात, अपयश आल्यानंतर आपण आपल्या चुका शोधायच्या असतात. आपण जनतेची सेवा करायला कुठे कमी पडलो हे लक्षात घेऊन सुधारणा केली पाहिजे. विरोधकांनी आपल्याला अपयश आले या भावनेने आता शांत राहिले पाहिजे, असा टोलाही लंके यांनी भाजप नेत्यांना लगावला.