नगर – सततच्या झालेल्या पावसामुळे पोलीस मुख्यालयातील मैलामिश्रीत पाणी घरामध्ये घुसले आहे. त्यामुळे वसाहतीत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महिलांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारीचा पाढा वाचला. मात्र, पोलीस प्रशासनाने ही दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे.
पोलीस मुख्यालयातील वसाहतीमध्ये सलगच्या झालेल्या पावसाने वसाहतीमधील गटारी तुंबल्या आहेत. त्यामुळे ते मैलामिश्रीत पाणी वसाहतीमध्ये घुसले असून नागरिकांना तेथे राहने ही मुश्किल झाले आहे. त्यामुळे वसाहतीमध्ये साथीचे आजार पसरत असून, आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रार केली असता त्यांनीही दुर्लक्ष केले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वसाहती मधील काही महिलांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यलय गाठले.
मात्र, पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांची भेट होवू शकली नाही. गेल्या काही दिवसापूर्वी पोलीस मुख्यालयातील कर्मचारी सुनील कुऱ्हे यांची मुलगी पूजा हिचा मृत्यू झाला होता. याबाबत पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस मुख्यालयातील नागरी सुविधांची संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यामध्ये महापालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील कार्यालयाचे अधिकारी सहभागी झाले होते. व नागरी सुविधांवर तातडीने काम करण्याच्या सुचनाही सिंधू यांनी दिल्या होत्या. त्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना टाईम लिमिट दिले होते. मात्र, आता पुन्हा नागरी सुविधाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत ऐन सनासुदीच्या काळात वसाहतीतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटणार का? असा ही प्रश्न उपस्थित होत आहे.