नवी दिल्ली – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ( uddhav thackeray ) धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत ( Dharavi project ) लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप लोकसभेतील शिवसेनेचे नेते खासदार राहुल शेवाळे ( rahul shewale ) यांनी आज येथे केला.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी बोलताना खासदार राहुल शेवाळे यांनी उध्दव ठाकरे यांचा चांगला समाचार घेतला. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी ठाकरे आता धारावीचा मुद्या उपस्थित करीत आहे. ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा धारावीचा विकास करण्यासाठी आपण स्वत: खासदार म्हणून लेखी निवेदन दिले होते. परंतु त्यांनी एकदाही माझ्याशी चर्चा केली नाही, असेही ते म्हणाले.
शेवाळे म्हणाले की, उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा शहरी विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी धारावीतील विकासाच्या आराखड्याचे विस्तृत सादरीकरण केले होते. परंतु, आता ते या मुद्यावर राजकारण करीत आहेत. ठाकरे यांनी १६ डिसेंबर रोजी अदानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
धारावी प्रकल्प केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहे. यास स्पेशल प्रोजेक्ट जाहीर करण्यात आले आहे. यात ३०० स्क्वेअर फूट जागा देण्यात येणार आहे. परंतु, धारावीकरांना ४०० ते ५०० स्क्वेअर फूट एवढी जागा दिली गेली पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.
ठाकरेंनी राजकारण करू नये
यावर बोलताना शेवाळे यांनी ठाकरे यांच्यावर राजकारण करण्याचा आरोप केला आहे. हा प्रकल्प ५० वर्षांपासून रखडला आहे. धारावीतील लोकांना चांगले घर रहायला मिळणार आहे. यात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जावू नये, असे आवाहन सुध्दा त्यांनी केले.