Ramdas Athawale : ‘लव्ह जिहाद’ कायद्याला मंत्री रामदास आठवले यांचा विरोध; म्हणाले धर्मांतर होऊ नये म्हणून….

राज्यात लव्ह जिहादद्वारे धर्मांतर करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यावर आता राज्य सरकारने लव्ह जिहादद्वारे धर्मांतर रोखण्यासाठी कडक पाऊले उचलत कायदा करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठित केली आहे. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया समोर आली असून, लव्ह जिहाद कायद्याला विरोध दर्शवत धर्मांतर होऊ नये म्हणून कायद्यात तरतूद असावी असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
लव्ह जिहाद कायद्याला माझा विरोध आहे. हिंदू-मुस्लिम मुले-मुली एकत्र आले, की त्यास असे म्हणणे योग्य नाही. दलित-सवर्णसुद्धा एकत्र येतात. मुले-मुली एकत्र येतात, अशी लग्न होतात. हिंदू- मुस्लिम लग्न झाले, की त्याला ‘लव्ह जिहाद’ म्हणणे चुकीचे आहे. मी याला सहमत नाही. परंतु धर्मांतर होऊ नये म्हणून कायद्यात तरतूद असावी, असे स्पष्ट मत मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. हा कायदा करत असताना जातीय सलोखा न बिघडवता योग्य भूमिका असावी. मोदी सर्वांना समान मानतात. त्यांनी सर्वांसाठी योजना आणल्या असल्याचे आठवले यावेळी बोलताना म्हणाले.
…अन्यथा स्वतंत्र लढू
येत्या काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून ग्राउंड लेव्हल मजबूत करण्याचे काम सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विषयी देखील आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत जागा मिळतील. जागा दिल्या नाही, तर स्वतंत्र लढण्याची आमची तयारी असल्याचे आठवले यावेळी म्हणाले. लोकसभा आणि विधानसभेला आम्हाला जागा मिळाल्या नाहीत. पण महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला जागा मिळतील, अशी आशाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.





