कराड – गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप केला आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी कारवाईच्या भीतीनं माझ्यावर कारवाई करण्यात आली. मुश्रीफ यांच्या विरोधातील सर्व पुरावे ईडीला देणार आहे, असंही सोमय्या यांनी सांगितले.
यासंबंधीचे पुरावे उद्या ईडी आणि इन्कमटॅक्स विभागाकडे देणार आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मी मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार आहे, असंही सोमय्या म्हणाले.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यासंबधी आज ते कोल्हापूर दौऱ्यावर निघाले होते. परंतु, कोल्हापूरच्या हद्दीत पोहचण्याआधीच सोमय्या यांना पोलिसांनी कराड येथे रोखले आहे.
त्यामुळे या घडामोडींना नाट्यमय वळण मिळाले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कथित घोटाळ्याविषयी अधिक माहिती तसेच तक्रार नोंदवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर दौऱ्याचे नियोजन केले होते.
कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कलम 144 लागू केल्याने मुंबईतील सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांनी सोमय्या यांना कोल्हापूरकडे जाण्यास मज्जाव केला. तरी त्यांनी आपला दौरा सुरू केला.
ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे येथे भाजप कार्यकर्त्यांनी सोमय्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरकडे निघालेल्या सोमय्या यांना कराड रेल्वे स्टेशनवर उतरवण्यात आले. आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांना कराड येथील शासकीय विश्रामगृहात हलवण्यात आले.