बीड – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी अजित पवार पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव चर्चेत असून त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याआधीच्या सरकारमध्ये (शिंदे सरकार) कृषीमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या एका निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंडे कृषीमंत्री असताना कोणत्या आधारावर त्यांनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केले? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. तसेच पुढील दोन आठवड्यात यासंदर्भात स्पष्टीकरण देखील मागितले आहे.
राज्यात कृषी साहित्य खरेदीसाठीची डीबीटी योजना मुंडे कृषीमंत्री असताना बंद करण्यात आली आणि कृषी साहित्य खरेदी करून शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी सरकारने १०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. याअंतर्गत स्प्रे पंप व इतर कृषी साहित्य खरेदी करून शेतकऱ्यांना पुरवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या खरेदीत घोटाळा झाल्याचा दावा केला जात आहे. या संदभात शंतनू घाटे यांनी नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली आहे.
यात घाटे यांनी दावा केला आहे की बाजारातील किंमतीपेक्षा जास्त किंमतीत कृषी साहित्य खरेदी करून कृषी विभागाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. ते म्हणाले, उच्च न्ययालयात मी अशी जनहित याचिका घेऊन आलो आहे की शासनाने १०३ कोटी रुपयांचे स्प्रे पंप विकत घेऊन लाभार्थी शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
या पंपासाठी शासनाने प्रति लाभार्थी ३,६२५ रुपये इतकी किंमत घेतली आहे. सुरुवातीला या स्प्रे पंपाची किंमत १,५०० रुपये ठेवण्यात आली होती. तर, बाजारात या पंपाची किंमत २,६०० रुपये इतकी आहे. मग इतक्या अधिक किंमतीत हे स्प्रे पंप खरेदी करण्याचे कारण काय? कोणत्या आधारावर ही किंमत वाढवण्यात आली. यात गैरकृत्य झाले असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्यामुळे उच्च न्यायालयाने शासनाविरोधात नोटीस काढली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.