नवी दिल्ली – हवाई दलाचे लढाऊ विमान मिग-21 आता पुन्हा एकदा उड्डाण करत आहे. आठ मे रोजी झालेल्या अपघातानंतर या लढाऊ विमानाच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली होती. राजस्थानमधील हनुमानगडमध्ये मिग 21 विमानाच्या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला होता.
हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही विमानाच्या अपघातानंतर, तपास पूर्ण होईपर्यंत तो ताफा ग्राउंड केला जातो. नंतर तांत्रिक तपासणीनंतर विमानातील दोष दूर झाल्यानंतरच विमान उड्डाण करण्यास परवानगी दिली जाते. मिग-21 हे हवाई दलातील सर्वात जास्त काळ सेवा देणारे लढाऊ विमान आहे. मिग-21 हे लढाऊ विमान 1963 मध्ये हवाई दलात समाविष्ट करण्यात आले होते. रशियाकडून आतापर्यंत 700 मिग 21 विमाने खरेदी करण्यात आली असून त्यापैकी सुमारे 400 मिग-21 विमाने क्रॅश झाली आहेत. त्यामुळे गमतीने या विमानांना उडत्या शवपेट्या अर्थात फ्लाईंग कॉफिन्स म्हणत असत.
सध्या हवाई दलात मिग-21 बायसनचे तीन फ्लीट आहेत, म्हणजे जवळपास50 विमाने आहेत. 2025 पर्यंत सर्व मिग 21 बायसन निवृत्त करण्याची हवाई दलाची योजना आहे. या लढाऊ विमानाच्या जागी देशात बनवलेले लढाऊ “तेजस’ तैनात केले जात आहे.