MI vs RCB Virat Kohli threw his hat on the ground in anger : ७ एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एमआय आणि आरसीबी यांच्यात एक रोमांचक सामना पार पडला. ज्यामध्ये आरसीबीने मुंबईचा १२ धावांनी पराभव केला. यासह आरसीबीने १० वर्षांनंतर वानेखेडवर मुंबईविरुद्ध विजयाची नोंद केली. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने एमआयसमोर २२२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ निर्धारित षटकांत ९ बाद २०९ धावाच करु शकला. दरम्यान या सामन्यात विराट यश-जितेशवर सोपा झेल सोडल्यामुळे संतापलेला दिसला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जितेश-यशवर संतापला विराट कोहली – ही संपूर्ण घटना एमआयच्या डावाच्या १२ व्या षटकात घडली, जेव्हा सूर्याने त्याच्या डावात यश दयालच्या स्लो डिलिव्हरीवर सीमा रेषेच्या पलीकडे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू हवेत उंच गेला. यष्टीरक्षक जितेश शर्मा झेल पकडण्यासाठी जवळजवळ अर्ध्या खेळपट्टीवर आला होता, त्यावेळी यशही झेल पकडण्यासाठी धावला, परंतु झेल घेताना दोन्ही खेळाडू एकमेकांना धडकले आणि सोपा झेल सुटला. ज्यामुळे सूर्यकुमार यादवला जीवनदान मिळाले. हा झेल सोडल्यानंतर विराट कोहली खूप संतापला आणि रागाने ओरडताना दिसला. यानंतर त्याने रागाच्या भरात टोपी जमिनीवर फेकली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. https://twitter.com/ChaudharyAkshS1/status/1909290580233904291 सूर्यकुमार यादवला जीवनदानाचा घेता आला नाही फायदा – विशेष म्हणजे सूर्याला मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेता आला नाही आणि त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो झेलबाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याची विकेट पुन्हा यश दयालनेच घेतली, यावेळी लियाम लिव्हिंगस्टोनने त्याचा झेल पकडला. सूर्यकुमार यादवने बाद होण्यापूर्वी २६ चेंडूत २८ धावा केल्या. यश दयालच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने या सामन्यात सूर्यकुमार यादवला बाद करण्यापूर्वी रोहित शर्मालाही बाद केले होते. त्याने ४ षटकांच्या स्पेलमध्ये ४६ धावा देत २ विकेट्स घेतल्या. हेही वाचा – MI vs RCB : वानखेडेवरील ऐतिहासिक विजयानंतर RCB ला दणका! BCCI ने केली मोठी कारवाई आरसीबीने वानखेडेवर मुंबईला केले चीतपट – सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने ५ विकेट्स गमावून २२१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, तिलक वर्माचे अर्धशतक आणि हार्दिक पंड्याच्या स्फोटक खेळीनंतरही मुंबई इंडियन्सला लक्ष्य गाठण्यात अपयश आले. मुंबईचा संघ निर्धारित षटकात ९ बाद २०९ धावाच करु शकला. आरसीबीसाठी विराट कोहलीने सर्वाधिक ६७ धावांचे, तर मुंबईसाठी तिलक वर्माने ५६ धावांचे योगदान दिले. तसेच क्रृणाल पंड्याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.