गतिशील शहरांत पुण्याचा क्रमांक : पहिल्या 20 शहरांत भारतातील 7 शहरांचा समावेश
पुणे – जगातील 130 शहरांचा रिअल इस्टेट आणि इतर मानदंडाच्या आधारावर अभ्यास करून त्यांचा गुणानुक्रम ठरविण्यात आला आहे. त्यामध्ये भारतातील बऱ्याच शहरांनी बाजी मारली आहे. पहिल्या 20 शहरांमध्ये पुण्यासह भारतातील 7 शहरांचा समावेश आहे.
जेएलएल या संस्थेने तयार केलेल्या या अहवालामध्ये पहिल्या क्रमांकावर हैदराबाद शहर आहे तर दुसऱ्या क्रमांकावरही भारतातील बेंगळुरू शहर आहे. या यादीमध्ये पुणे 12 व्या क्रमांकावर, चेन्नई 5 व्या क्रमांकावर, दिल्ली 6 व्या क्रमांकावर, कोलकत्ता 16 व्या क्रमांकावर आणि मुंबई 20 व्या क्रमांकावर आहे.
संबंधित शहरातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कशी आहे, शाश्वत विकासासाठी ही शहरे कोणत्या उपाययोजना करतात. या शहरातील नागरिक शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून कुठले योगदान देतात. या आधारावर ही क्रमवारी ठरविली जाते, असे जेएलएल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नायर यांनी सांगितले. विशेष म्हणजे गेल्यावर्षी या यादीत पहिल्या क्रमांकावर बेंगळुरूचा समावेश होता. आता बेंगळुरू दुसऱ्या क्रमांकावर गेले आहे. तर भारतातीलच हैदराबाद पहिल्या क्रमांकावर गेले आहे. जगभरात मंदीने धुमाकूळ घातला आहे. भारताचा विकासदरही कमी होणार आहे. अशा परिस्थितीतही शहरे वाढत आहेत ही समाधानाची बाब आहे, असे नायर यांनी सांगितले.
भारतातील शहराच्या पायाभूत सुविधा विकासासाठी राज्याबरोबरच केंद्र सरकार निश्चितपणे उपाययोजना करीत आहे. त्यामुळे या शहरांचे भविष्य चांगले आहे, असे वाटून या शहरातील रिअल इस्टेट आणि इतर क्षेत्रांमध्ये जगभरातून गुंतवणूक वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या 130 शहरांच्या यादीमध्ये एशिया पॅसिफिक क्षेत्रातील जवळजवळ 70 टक्के शहरांचा समावेश आहे. त्यामुळे विकासाचे वारे आता पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे. भारताबरोबरच चीन आणि व्हिएतनाम या देशांतील अनेक शहरांचा या यादीमध्ये समावेश आहे.
पुण्यातील मेट्रोसह इतर उपाययोजनांची दखल
पुण्यासह भारतातील मोठ्या शहरांमध्ये कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. या शहरांमध्ये मेट्रोसारख्या सुविधा वाहतुकीसाठी निर्माण केल्या जात आहेत. या सर्व घडामोडींची दखल अहवाल तयार करताना घेण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ही शहरे पर्यावरणाचा नाश न करता योग्य पद्धतीने विस्तारली जातील याची काळजी घेण्यात येत असल्याचे अहवालात म्हटले आहे. हैदराबाद मधील एका नावीन्यपूर्ण घडामोडींची दखल या अहवालात घेण्यात आलेली आहे. एअर कंडिशनिंगचा वापर कमी केला जावा याकरिता कूल रुफचा वापर करण्यात येत आहे. या यंत्रणेमध्ये छतावर पडलेला सूर्यप्रकाश परावर्तित होतो आणि कमी उष्णता इमारतीमध्ये शोषली जाते.