Menstrual Hygiene Day: मासिक पाळी आणि समाजाची ‘वैचारिक स्वच्छता’!
Menstrual Hygiene Day देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील, ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलीला, स्त्रीला सॅनिटरी नॅपकिन्स, स्वच्छ पाणी आणि सुरक्षित प्रसाधने मिळायला हवीत. मासिक पाळीदरम्यानच्या संसर्गामुळे हजारो स्त्रिया विविध आजारांना बळी पडतात, ही वस्तुस्थिती आहे.

Menstrual Hygiene Day: “जन्मलो ज्या बिजा पासून, त्यालाच ठरवलं अपवित्र, नडली एखादी स्त्री रूढीं-परंपरेला, तर पाहिलं जातं तिचं चारित्र्य…” या दोन ओळी आजच्या २१ व्या शतकातील आपल्या ढोंगी आणि दुटप्पी समाजाच्या चेहऱ्यावर सणसणीत चपराक मारतात. दरवर्षी २८ मे रोजी ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन’ साजरा केला जातो. हा दिवस केवळ सॅनिटरी पॅड्स वाटण्याचा, जाहिराती करण्यापुरता किंवा स्वच्छतेविषयी वरवरच्या गप्पा मारण्याचा नाही. हा दिवस वरील ओळींमध्ये दडलेली सामाजिक वेदना, स्त्रीचा आक्रोश आणि शतकानुशतके चालत आलेल्या विद्रोहाचा गांभीर्याने विचार करण्याची आठवण करून देणारा दिवस आहे.
विज्ञान कितीही पुढे गेले, आपण कितीही डिजिटल आणि आधुनिक झालो, तरी आजही आपल्या तथाकथित सुशिक्षित समाजात मासिक पाळी हा विषय भिंतीआड, कुजबुजत्या आवाजात आणि मेडिकलच्या दुकानातून काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत लपवूनच घरी आणला जातो. ज्या निसर्गाच्या चक्रातून, ज्या रक्ताच्या बिजातून या पृथ्वीवरील प्रत्येक माणसाचा मग तो राजा असो वा रंक जन्म झाला, त्याच नैसर्गिक प्रक्रियेला समाजाने ‘अपवित्र’ आणि ‘अस्पृश्य’ ठरवले.
हा केवळ एका स्त्रीचा अपमान नाही, तर तो या निसर्गाचा आणि मातृत्वाचा सर्वात मोठा अपमान आहे. मासिक पाळी ही विज्ञानाची, आरोग्याची आणि सृजनाची खरी ओळख आहे. पण आपण तिला अंधश्रद्धेच्या, रूढींच्या आणि तथाकथित संस्कृतीच्या बेड्या ठोकल्या. ज्या बिजा पासून माणसाचं अस्तित्व सुरू होतं, त्यालाच ‘अशुद्ध’ म्हणणे हा माणसाच्या वैचारिक दिवाळखोरीचा सर्वोच्च बिंदू आहे. (Menstrual Hygiene Day)

Menstrual Hygiene Day
याहून भयंकर आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे, जेव्हा एखादी मुलगी किंवा स्त्री या जुनाट, कालबाह्य रूढी-परंपरांना नडते, तेव्हा समाज तिची बाजू ऐकून घेत नाही. जेव्हा ती मासिक पाळीच्या दिवसांत देव्हाऱ्यात जाण्याचा, मंदिरात पाऊल ठेवण्याचा किंवा घरात सन्मानाने, मोकळेपणाने वावरण्याचा हक्क मागते, तेव्हा समाज तिच्या वैज्ञानिक आणि पुरोगामी विचारांना समजून घेत नाही. उलट, तिच्यावर ‘संस्कारहीन’ किंवा ‘बंडखोर’ असल्याचा शिक्का मारला जातो. परंपरा मोडणाऱ्या, स्वतःचे हक्क मागणाऱ्या स्त्रीचे चारित्र्यहनन करणे, तिच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, हा पुरुषप्रधान मानसिकतेचा आणि या समाजाचा सर्वात सोपा, सोयीस्कर आणि जुना मार्ग राहिला आहे. ( Menstrual Hygiene Day)
स्त्रीला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी तिच्या चारित्र्यावर चिखलफेक करायची, जेणेकरून इतर कोणत्याही स्त्रीने बंड करण्याची हिंमत करू नये, हेच या समाजाचे जुने शस्त्र राहिले आहे. आणि याहूनही मोठी शोकांतिका म्हणजे, समाजात वावरताना काही स्त्रियांनी स्वतःलाच या अनिष्ट रूढी-परंपरांच्या बेड्यांमध्ये बांधून घेतले आहे. वर्षानुवर्षे झालेल्या मानसिक खच्चीकरणामुळे अनेक स्त्रिया या प्रथांना आपला ‘धर्म’ किंवा ‘संस्कार’ मानू लागतात. आपण पाळीच्या काळात बाजूला बसलो नाही तर देवाचा कोप होईल किंवा आपल्यामुळे घर अपवित्र होईल ही भीती त्यांच्या मनात एवढी खोलवर रुजवली गेली आहे की, त्या स्वतःहून या शोषणाला संमती देतात. जेव्हा एखादी तरुण मुलगी किंवा सून या जुनाट विचारांना छेद देण्याचा प्रयत्न करते, तेव्हा पुरुषी मानसिकतेपेक्षा घरातील ज्येष्ठ स्त्रियाच तिच्या मार्गात पहिला अडथळा बनतात. आम्ही आयुष्यभर पाळलं, मग तुला काय त्रास आहे? असा प्रश्न करत नव्या पिढीचे पंख छाटण्याचे काम दुर्दैवाने घरातूनच होते. स्वतः सोसलेले दुःख दुसऱ्या स्त्रीच्या पदरात टाकून या अनिष्ट परंपरांचे चक्र चालू ठेवण्यात काही स्त्रियाच नकळत कारणीभूत ठरतात.
देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील, ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलीला, स्त्रीला सॅनिटरी नॅपकिन्स, स्वच्छ पाणी आणि सुरक्षित प्रसाधने मिळायला हवीत. मासिक पाळीदरम्यानच्या संसर्गामुळे हजारो स्त्रिया विविध आजारांना बळी पडतात, ही वस्तुस्थिती आहे. यासाठी सरकारी आणि सामाजिक पातळीवर अनेक संस्था काम करतात, पण
शारीरिक स्वच्छतेपेक्षाही आज समाजाला ‘वैचारिक स्वच्छतेची’ जास्त गरज आहे. जोपर्यंत आपल्या घरातील पुरुष, वयोवृद्ध आणि संपूर्ण समाज मासिक पाळीला अपवित्र मानण्याची आपली कुंठित मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत व्यासपीठांवरून पुरोगामित्वाच्या आणि स्त्री सक्षमीकरणाच्या गप्पा मारणे निव्वळ व्यर्थ आणि ढोंगीपणाचे आहे.

Menstrual Hygiene Day
खरंतर ही वैचारिक स्वच्छता कुठून सुरू होणार? तिची सुरुवात मोठ्या भाषणांमधून नाही, तर आपल्या स्वतःच्या घरापासून व्हायला हवी. जेव्हा एखादा बाप किंवा भाऊ आपल्या मुलीसाठी किंवा बहिणीसाठी मेडिकलमधून न लाचकरता, न लपता पॅडचे पाकीट उघडपणे घरी आणेल. जेव्हा घरात मासिक पाळी चालू असलेल्या स्त्रीला कोपऱ्यात न बसवता, मासिक पाळीच्या दिवसात स्त्रीला होणाऱ्या वेदना कष्ट पाहता तीला तिच्या कामात हातभार लावतील. जेव्हा शाळा-कॉलेजांमध्ये मुला-मुलींना एकत्र बसवून या विषयावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उघडपणे शिकवले जाईल. त्याच दिवशी खऱ्या अर्थाने या वैचारिक स्वच्छतेची पहिली पायरी आपण पार करू.
खऱ्या पुरोगामित्वाचे लक्षण मासिक पाळी ही निसर्गाने स्त्रीला दिलेली एक अद्भुत शक्ती आहे, ज्यामुळे या सृष्टीचे चक्र अविरत सुरू आहे. जर मासिक पाळी नसती, तर मानवाचे अस्तित्वच उरले नसते. त्यामुळे, २८ मे हा दिवस केवळ कॅलेंडरवरील एक दिवस म्हणून साजरा न करता, स्त्रीच्या या सृजनत्वाला अपवित्र मानण्याची, तिला दुय्यम दर्जा देण्याची मानसिकता समाजाने आता कायमची सोडली पाहिजे. निसर्गाच्या या सुंदर नियमाचा, स्त्रीच्या वेदनेचा आणि तिच्या सृजनाचा सन्मान करणे हेच २१ व्या शतकातील आपल्या खऱ्या पुरोगामित्वाचे आणि सुजाणपणाचे लक्षण ठरेल.

