मंचर : शिरूर,आंबेगाव,जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा उपद्रव वाढल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लवकरच पुणे जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन उपाययोजना करण्याची मागणी करणार असल्याची माहिती पुणे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रविवार, दि. १२ रोजी मंचर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. पिंपरखेड येथील बालिका शिवान्या बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी बोंबे कुटुंबियांचे सात्वन करण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. ते म्हणाले, शिरूर तालुक्यातील पिंपरखेड,काठापूर, जांबुत या गावात या घटना वारंवार होत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यामुळे दोन वर्षात जांबुत येथे चार तर पिंपरखेड या ठिकाणी तीन घटना घडलेली आहे. वन खाते त्यांच्या परीने उपाययोजना करीत असले तरीही वरिष्ठ पातळीवर विशेष करून केंद्रातून यावर काहीतरी उपाय निघत नाही. काही होताना दिसत नाही. अनेक बैठका झाल्या,परंतु तसं काही निर्णय होत नाही.त्यावर नसबंदी हा एक उपाय आहे.परंतु त्याला मान्यता मिळत नाही. परंतु या घटना वारंवार होत आहेत.या घटना आपण किती सहन करायच्या. या गोष्टीला कुठेतरी गांभीर्याने घेतलं पाहिजे. लवकरच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत पुणे जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेवून उपाययोजना करता येईल. या संदर्भात चर्चा करू. केंद्राचा कायदा नसबंदी करण्यास परवानगी देत नाही.परंतु खेड,आंबेगाव, जुन्नर या परिसरामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हजाराच्या घरात या बिबट्यांची संख्या गेली असून त्याचा बंदोबस्त नाही झाला तर लोकांना जगण कठीण होईल. बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी घरातून बाहेर पडायला मागत नाही.असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.