लखनौ – बसप अध्यक्षा मायावती यांनी कॉंग्रेस अन् भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हटले आहे. महाआघाडीला नुकसान पोहोचावे याच हेतूने कॉंग्रेसने सर्व ठिकाणी उमेदवार उभे केल्याचा आरोप मायावतींनी केला आहे.
कॉंग्रेस अन् भाजप दोन्ही पक्ष महाआघाडीला घाबरले आहेत. कॉंग्रेसच्या भूलथापांना बळी न पडता लोकांनी महाआघाडीला मत द्यावे. कॉंग्रेसच्या उमेदवारांमुळे भाजपला लाभ पोहोचत असल्याचे मायावती यांनी सांगितले.
भाजपप्रमाणेच कॉंग्रेसही गरळ ओकत आहे. संसदेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींची गळाभेट का घेतली असे मायावती म्हणाल्या.भाजप अन् कॉंग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. यामुळे दोन्ही पक्ष जनतेची दिशाभूल करण्याकरिता खोटे दावे करत आहेत. 5 वर्षांपर्यंत पंतप्रधान मोदी पाकिस्तानबद्दल मौन बाळगून राहिले. निवडणुकीच्या तोंडावर ते पाकिस्तानच्या विरोधात बोलत असून स्वतःचे अपयश झाकत आहेत.