प्रभात वृत्तसेवा पवनानगर – पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित पुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.स्पर्धेचा पहिला टप्पा मंगळवारी (दि. २०) सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पौड, लोणावळा ग्रामीण, कामशेत आणि वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतून पार पडणार आहे. या टप्प्याचे एकूण अंतर ५३.८ किलोमीटर आहे. स्पर्धेदरम्यान वाहतूक काही ठिकाणी बंद व काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना वाहतूक बदलांची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक बदलांचा तपशील पुढीलप्रमाणे पर्यायी रस्ता नसल्याने राज्य महामार्ग क्र. १३० वरील घोटावडे गाव बापुजीबुवा मंदिर ते अंबडवेट कमान, एम.डी.आर. क्र. ११० वरील अंबडवेट कमान ते पौड करमोळी चौक तसेच एम.डी.आर. क्र. २६ वरील पौड करमोळी चौक ते काशिंग जवण चौक या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. चावसर, जवन क्र. २ व ३ गावाकडून येणारी वाहने जवन क्र. १ येथे न येता तुंगी फाटा मार्गे लोणावळा या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत. आंबेगाव, शिंदगावकडून येणारी वाहने कार्ले फाटा येथे येण्यास बंद असून ती दुधिवरे-औंढे-औंढोली मार्गे लोणावळा येथे वळविली जाणार आहेत. कामशेत ते पवनानगर-पौड मार्गे जाणारी वाहतूक स्पर्धा संपेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेत कि.मी. ४५/६०० पवना चौक येथे पवनानगरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. शिरगाव-परंदवडीकडून येणारी वाहतूक बेबडओहोळ मार्गे न पाठवता जुना मुंबई-पुणे महामार्ग वापरण्यात येईल. चांदखेड-डोणे तसेच कामशेत-भूगावकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग नसल्याने मौजे कामशेत येथे पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मळवंडी ढोरे व शिवली गावाकडून येणारी वाहतूक येलघोल फाटा येथे स्पर्धा संपेपर्यंत बंद राहील. स्पर्धेदरम्यान पवनानगर बाजार बंद पुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६ सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पवनानगर येथील रोज भरणारा बाजार दि. २० जानेवारी २०२६ रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.