किवळे – गेली अनेक दिवसांपासून दडी मारलरल्या पावसाने दोन दिवसांपुर्वी लावलेल्या हजेरीने बॅकलॉग भरून काढला. त्यामुळे मावळ तालुक्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. मावळ तालुक्यात यंदा सोयाबीनची लागवड वाढली आहे. दमदार पावसाच्या भरवशावर सोयाबीनचे पीक जवळपास सर्वच भागात बहरले असल्याचे चित्र आहे.
पुणे जिल्ह्यात मुख्य पीक म्हणून सोयाबीन पिकाची ख्याती वाढत चालली आहे.तर मावळातील शेतकरीदेखील आता सोयाबीनकडे वळत आहेत. त्यानुसार सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची दरवर्षी पेरणीसुद्धा होते. परंतु, कीड, रोगांचा वाढता प्रादुर्भाव, दुष्काळ, अतिवृष्टीचा फटका बसत असल्याने गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनच्या उत्पादनात घट होत गेली आहे. त्यामुळे सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. असे असताना देखील सोयाबीन उत्पादकांनी पीक पेरणीमध्ये बदल केला नाही. यावर्षी मावळ तालुक्यात सोयाबीन पिकाची लागवड 100 हेक्टरपर्यंत वाढली आहे.
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्टचा पंधरवडा मोठ्या पावसाने झाल्याने काही भागात पाणी तुंबल्याने पिकाचे नुकसान झाले. मात्र, त्यानंतर पोषक हवामान राहिल्याने बहुतांश भागात तग धरून राहिलेले सोयाबीनचे पीक चांगले बहरले असल्याने पिकाला शेंगाही लागण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे यावर्षी तरी भरघोस उत्पादन होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षीच्या उत्पादनालाही चांगले भाव मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना व्यक्त केली.
पावसाने ओढ दिल्याने सोयबीनचे पिक हातचे जाण्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, एक दिवसाच्या दमदार पावसाने तालुक्यातील सर्वच पिकांना तारले आहे. यंदा आम्ही सोयाबीनवर लक्ष केंद्रीत केले आहे. हे पिकदेखील जोमात आले असून, त्याला चांगाल दर मिळण्याची अपेक्षा आहे.
संभाजी गायकवाड, शेतकरी