Maval Drowning – कामगार दिनाच्या सुट्टीत सहलीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तरुणांवर दुर्दैवी प्रसंग ओढवला. मावळ तालुक्यातील जाधववाडी धरण आणि साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून चार तरुणांचा मृत्यू झाला. या दुहेरी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. निष्काळजीपणा आणि पाण्याचा अंदाज न आल्याने हे जीवितहानीचे प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. नवलाख उंबरे येथील जाधववाडी धरण परिसरात काही तरुण फिरण्यासाठी आले होते. अजय गारुडे, संतोष एडके आणि अनिकेत पवार हे तिघे पाण्यात उतरले. त्यांच्यासोबत आणखी काही जण होते. पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने एकूण पाच जण बुडाले. स्थानिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र तिघांना वाचवता आले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकाने धाव घेतली. बुडालेल्या तरुणांना बाहेर काढून सीपीआर देण्यात आला. मात्र वेळ निघून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. दुसरी घटना साळुंब्रे येथील जुन्या दगडी पुलाजवळ घडली. मनोज भारत गौतम (वय २५, मूळ रा. उत्तर प्रदेश) हा तरुण सकाळी नदीत पोहण्यासाठी उतरला होता. पाण्याची खोली न समजल्याने तो बुडाला. मनोज हा स्थानिक काळोखे पाइप लाइन कंपनीत काम करत होता. घटनांची माहिती मिळताच विविध संस्थांची पथके घटनास्थळी दाखल झाली. वन्यजीव रक्षक मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि NDRF यांनी संयुक्तपणे बचाव मोहीम राबवली. अथक प्रयत्नांनंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये धरण आणि नदी परिसरात पर्यटकांची गर्दी वाढते. अशा ठिकाणी पाण्याची खोली, प्रवाह आणि सुरक्षिततेची साधने यांची खात्री करणे आवश्यक आहे. निष्काळजीपणामुळे जीवितहानी होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. मावळ तालुक्यातील या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पर्यटनाचा आनंद घेताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा क्षणिक आनंद आयुष्यभराचे दुःख देऊन जातो.