आळंदी -पालखी सोहळ्याची पायी वारी पूर्ववत असती, तर सोहळा आज रोजी वाल्हेचा मुक्काम करून पालखी पुणे जिल्ह्यातील हद्द ओलांडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केला असता. तत्पूर्वी माऊलींच्या चल पादुकांचे नीरा स्नान पार पाडले जात असते;
परंतु करोनाच्या महामारीमुळे यंदाचे नीरा स्नान प्रातिनिधिक स्वरुपात आळंदीत पार पाडले गेले. त्यासाठी माऊलींना स्नान घालण्यासाठी नीरा नदीतील दत्त घाट येथून जल आणण्यात आले.
प्रथा परंपरेनुसार संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर हे नीरा नदीचे पवित्र जल अलंकापुरीत घेऊन आले. आज प्रातिनिधिक स्वरुपात संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगेश देसाई,
पालखी सोहळा मालक ऋषीकेश आरफाळकर यांच्या हस्ते नीरास्नान घालण्यात आले. याप्रसंगी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, राजाभाऊ चौधरी, चोपदार, माऊलींचे मानकरी साहिल कुऱ्हाडे, स्वप्नील कुऱ्हाडे, पुजारी राहुल जोशी निखिल प्रसादे उपस्थित होते.
आज पहाटेपासून माऊलींच्या चल पादुकांना पवमान अभिषेक, दूध आरती, जागरण असे विविध धार्मिक कार्यक्रम गांधी कुटुंबीयांच्या वतीने पार पडले.
आजचा माऊलींच्या पादुकांचा सहावा मुक्काम आजोळ घरी असून, आणखी 10 दिवस पादुका याच ठिकाणी मुक्कामी असणार असल्याचे व्यवस्थांचे प्रमुख व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.